कृषी, घरगुती पाणी वापर दरात १७ टक्के वाढ ः के. पी. बक्षी

सिंचन
सिंचन

मुंबई: महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पिण्याचे पाणी, शेतीसाठी वापरण्यात येणारे पाणी, तसेच उद्योगासाठी व अन्य घटकांसाठी वापरण्यात येणाऱ्या पाणी वापराचे सुधारित दर जाहीर केले आहेत. यात कृषी सिंचन आणि घरगुती पाणी वापराच्या दरात १७ टक्के, तर उद्योगांसाठीच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी दिली.  या वेळी नियमन प्राधिकरणाचे सदस्य डॉ. शिवाजी सांगळे, विनय कुलकर्णी, विनोदकुमार तिवारी उपस्थित होते.श्री. बक्षी पुढे म्हणाले, पाणी वापराचे सुधारित दर पाणी वापर संस्था, जलतज्ज्ञ, शासनाचे विविध विभाग, अशासकीय संस्था यांच्याबरोबर चर्चा करून ठरविण्यात आले आहेत. प्राधिकरणाने अपेक्षित व्यवस्थापन खर्चाची विभागणी घरगुती पाणी वापर, औद्योगिक पाणी वापर व कृषीसाठी पाणी वापरणारे शेतकरी यांच्यावर आर्थिक भार पेलण्याची क्षमता, सुलभ उपलब्धता, पाण्याच्या गुणवत्तेवरील परिणाम इत्यादी बाबी विचारात घेऊन पाणी पट्टीचे दर ठरविले आहेत. घरगुती पाणी वापरासाठी धरणातून पाणी घेणाऱ्या महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतीसाठी पाणीपुरवठ्याचा मानक दर प्रतिघनमीटर (१ हजार लिटर) दर अनुक्रमे २५ पैसे, १८ पैसे व १५ पैसे इतका राहणार आहे. पाणी वापरावर नियंत्रण येण्यासाठी प्राधिकरणाने पाणी पट्टीसाठी तीन टप्पे केले आहेत. मंजूर पाणी वापराच्या क्षमतेपेक्षा ११५ टक्के ते १४० टक्के जास्त पाणी वापरासाठी हाच दर दीड पट दर राहणार आहे. मंजूर पाणी वापराच्या १४० टक्क्यापेक्षा पुढील पाणी वापरावर दुप्पट दर आकारणी होणार आहे. पाण्याचे सुधारित दर ठरविण्याबरोबरच पाणी वापराच्या मर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतीसाठी पूर्वी दररोज माणशी ४० लिटरची मर्यादा आता वाढवून ५५ लिटर इतकी करण्यात आली आहे. ‘क’ वर्ग नगरपालिकांसाठी ७० लिटर, ‘ब’ वर्गासाठी १०० लिटर, ‘अ’वर्ग नगरपालिकांसाठी १२५ लिटर, ५० लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या महापालिकेस १३५ लिटर, ५० लाखापेक्षा जास्त असलेल्या महापालिकेस ही मर्यादा १५० लिटर इतकी राहील. थेट धरणातून पाणी घेतल्यास औद्योगिक वापरासाठीचे दर प्रतिघनमीटर ४ रुपये ८० पैसे इतका राहणार आहे. कृषी उद्योगासाठी या दरात २५ टक्के सवलत देण्यात आली आहे. मिनरल वॉटर, शीतपेय, बिअर उत्पादक उद्योगांसाठीचा दर प्रतिघनमीटर १२० रुपये इतका आहे.    नवे दर उन्हाळी हंगामापासून लागू पाणी वापरासाठीचे ठोक जलदर बिगर सिंचन (घरगुती व औद्योगिक) पाणी वापराचे सुधारित दर १ फेब्रुवारी २०१८ पासून, तर सिंचनासाठीचे सुधारित दर आगामी उन्हाळी हंगामापासून लागू होणार आहेत. वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी पाण्याचा दर खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी अनुक्रमे प्रतिघनमीटर (१ हजार लिटर) ४.५ पैसे, ९ पैसे व १३.५ पैसे इतका राहणार आहे. पाणी वापर संस्थांच्या स्थापनेस प्रोत्साहन देण्यासाठी या दरात २५ टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी वापरणाऱ्यांना या दरात २५ टक्के प्रोत्साहनात्मक सूट देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com