अकोला ः केंद्र शासन पुरस्कृत बळिराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत मंजूर झालेली या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे जास्तीत जास्त एक वर्षात पूर्ण करण्यासाठी सारी शक्ती पणाला लावू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अकोला तालुक्यातील गांधीग्राम येथे या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ११ प्रकल्पांचे कार्यान्वितीकरण आणि राष्ट्रीय महामार्गांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे आदी या वेळी उपस्थित होते.
मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पांची कामे रखडलेली होती, ही कामे मार्गी लावण्यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बळिराजा संजीवनी योजनेअंतर्गत सदर भागातील १०७ प्रकल्पांना तत्काळ मंजुरी दिल्याने आता ही कामे मार्गी लागणार आहेत. ही कामे एक वर्षात निश्चितपणे पूर्ण केली जातील.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत ४२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. अकोला जिल्ह्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यासाठी ७२८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांना ४५०० नवीन विहिरी देण्यात आल्या असून, नऊ हजारपेक्षा जास्त कृषिपंप वीजजोडण्या करण्यात आल्या आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना वीज, पाण्याची अजिबात उणीव भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
श्री. गडकरी म्हणाले, की बळिराजा जलसंजीवनीअंतर्गत मंजूर झालेली कामे शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. सिंचन प्रकल्पाची सर्व कामे एक वर्षात पूर्ण करण्यात यावी, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तसेच अकोला जिल्ह्यात नवीन उद्योग आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील.