टेंभू योजनेतील साडेचौदा हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताविना

टेंभू उपसा सिंचन योजनच्या लाभक्षेत्रात परिसरातील पाच गावांचा समावेश नाही. त्यामुळे नेहमीच आम्हाला शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेत परिसरातील पाच गावांचा समावेश करावा. - नाना मोरे, विभूतवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
सांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आटपाडी तालुक्‍याला मिळाले आहे. या पाण्यामुळे पीक पद्धतीत बदल झाला आहे. फळबाग, भाजीपाला पिकांचे क्षेत्र वाढले आहे.  मात्र, या योजनेचे आटपाडी तालुक्‍यातील एकूण लाभक्षेत्र १६ हजार हेक्‍टर असून, त्यापैकी केवळ १२०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली असून अजून १४ हजार ८०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आलेले नाही. त्यामुळे उर्वरित क्षेत्राला ‘टेंभू’चे पाणी लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
 
टेंभू योजनेच्या पाण्यामुळे आटपाडी तालुक्‍यातील शेती हिरवीगार होऊ लागली आहे. पाणी आल्याने भाजीपाला आणि फळबागांचे क्षेत्र वाढत आहे. तालुक्‍याची दुष्काळी ही प्रतिमा बदलत आहे. मात्र, उर्वरित क्षेत्राला पाणी मिळाले तर नक्कीच हा तालुका दुष्काळमुक्त होईल. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी उर्वरित क्षेत्राला पाणी देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. 
 
आटपाडी तालुक्‍यात पाणीटंचाई नेहमीचीच आहे. पाणीटंचाई भासू लागली की टॅंकरची मागणी या तालुक्‍यातून पहिल्यांदा होते. पाणीटंचाई असूनदेखील डाळिंबाची लागवड येथील शेतकरी करत आहेत. आटपाडी तालुक्‍यात डाळिंबाचे क्षेत्र सुमारे २५०० हेक्‍टर आहे. चार-पाच वर्षांपासून ‘टेंभू’चे पाणी तालुक्‍यातील काही भागात आले आणि पाण्यासाठीचा संघर्ष थांबला. पाणी आल्याने डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत डाळिंबाच्या क्षेत्रात एक हजार ते १२०० हेक्‍टरने वाढ झाली आहे.
 
‘टेंभू’चे पाणी तालुक्‍यातील बहुतांश तलावत पोचले. इतर भागात पाण्याच्या उपलब्धतेची परिस्थिती चांगली आहे. 
उन्हाळी हंगामात पीक लागवडीच्या क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. ‘टेंभू’च्या पाण्यामुळेच हा बदल झालेला दिसत आहे.

आटपाडी तालुक्‍यात टेंभू योजनेचे पाणी आले आणि पाणीप्रश्‍न मिटला. वास्तविक पाहता, यातून तालुक्‍यातील केवळ १२०० हेक्‍टरला पाणी मिळाले. त्यामुळे तालुक्‍यातील सर्वच गावांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. झरे, विभूतवाडी परिसरातील पाच गावे या योजनेच्या पाण्यापासून अद्यापही वंचित आहेत. यामुळे या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे.  या गावांना पाणी मिळणे कठीण झाले असून ही गावे ‘टेंभू’च्या लाभक्षेत्रात समाविष्ट करावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com