‘ऑपरेशन ग्रीन’च्या मार्गदर्शक सूचना महिनाभरात : जे. पी. मीना

‘ऑपरेशन ग्रीन’च्या मार्गदर्शक सूचना महिनाभरात : जे. पी. मीना
‘ऑपरेशन ग्रीन’च्या मार्गदर्शक सूचना महिनाभरात : जे. पी. मीना

पुणे : देशातील बटाटा, कांदा, टोमॅटोच्या पिकांच्या समस्या हाताळण्यासाठी केंद्र शासनाने ‘ऑपरेशन ग्रीन’ योजना तयार केली आहे. महाराष्ट्रासाठी अधिक उपयुक्त असलेल्या या योजनेच्या मार्गदर्शक सूचना महिनाभरात जाहीर केल्या जातील, असे केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाचे सचिव जे. पी. मीना यांनी स्पष्ट केले.  राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी यशदामध्ये आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलते होते. राज्याचे अपर मुख्य सचिव बिजय कुमार, कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, ‘एमएसीपी’चे प्रकल्प संचालक सुशील खोडवेकर, सातारा मेगा फूड पार्कचे उपाध्यक्ष विजयकुमार चोले; तसेच इतर उच्चपदस्थ अधिकारी या वेळी उपस्थित होते.  ‘‘देशात एक लाख कोटी रुपये किमतीचा शेतमाल दरवर्षी वाया जातो. यामुळे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होते. त्यामुळे आता मूल्यवर्धन साखळी विकसित केल्याशिवाय कोणताही अन्य पर्याय नाही. त्यासाठीच केंद्र सरकारने सहा हजार कोटी रुपयांची प्रधानमंत्री किसान संपदा योजना आणली आहे. यातून देशात प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल. शेतकऱ्यांचा आर्थिक विकास आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्याची क्षमता अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आहे. मात्र, जादा उत्पादनामुळे एका बाजूला रस्त्यावर माल फेकला जात असून, दुसऱ्या राज्यात त्याच मालाची टंचाई असल्याचे चित्र दिसते. ही स्थिती बदलण्याची क्षमता केवळ प्रक्रिया उद्योगातच आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीतदेखील या उद्योगाची मोठी भूमिका असेल, असेही श्री. मीना म्हणाले.  अपर मुख्य सचिव बिजय कुमार म्हणाले, की राज्यातील प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री कृषी अन्नप्रक्रिया योजना चालू करण्यात आली आहे. त्यात आम्ही शेतकऱ्यांपासून ते बाजार व्यवस्थेपर्यंत सर्व साखळीचा विचार करतो आहे. काही बाबींवरील उपाय हे शासनाच्या कक्षेबाहेरचे असले तरी बंद पडलेल्या प्रक्रिया उद्योगांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. या वेळी राज्याचे कृषी प्रक्रिया संचालक विजय घावटे यांनी मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजनेचे सादरीकरण केले.  प्रक्रियेच्या वाणांवर संशोधन का नाही फळे आणि भाजीपाला उत्पादनात भारत जगात अग्रगण्य असताना देशाच्या अन्न प्रक्रिया उद्योगांना नाईलाजाने कच्चा माल चक्क विदेशातून आणावा लागतो. २० लाख टन गहू आयात केला जातोय. टोमॅटो प्रक्रियेसाठी ४० टक्के माल तर सफरचंद प्रक्रियेतील ८० टक्के माल आयात केला जात आहे. हे का घडते आहे हे मला कळत नाही. देशाच्या प्रक्रिया उद्योगांना लागणाऱ्या वाणांचा विकास आणि उत्पादन करण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांची आहे, असे केंद्रीय सचिवांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com