सांगली ः शिराळा तालुक्याची गूळ उत्पादक तालुका म्हणून ओळख आहे. तालुक्यातील गुऱ्हाळघरे सुरू झाली आहेत. मात्र मजुरांच्या टंचाईमुळे गुऱ्हाळांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. त्यातही मजरांकडून फसवणूक होत असल्याने गुऱ्हाळ घरमालक आर्थिक संकटात सापडले आहेत.
शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळ उद्योगाला मोठा इतिहास आहे. या उद्योगाच्या माध्यमातून शेकडो हातांना रोजगाराची संधी प्राप्त होत होती. कोल्हापूर आणि कऱ्हाड (जि. सातारा) तालुक्यातील बाजारपेठेत शिराळा व शाहूवाडी तालुक्यांतील गुळाच्या अवीट चवीने तालुक्याची ओळख सर्वदूर नेली आहे.
शिराळा तालुक्यात गुऱ्हाळघरांना पुरेल एवढ्या उसाची उपलब्धता आहे. मात्र, याच तालुक्यात कारखानादेखील आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात केवळ २० गुऱ्हाळघरे सुरू झाली होती. मात्र, यंदा २० गुऱ्हाळघरे सुरू होणार का, असा प्रश्न गूळ उत्पादकांना पडला आहे. एकेकाळी तालुक्यात ५० गुऱ्हाळघरे होती. मात्र, दरवर्षी गुऱ्हाळे सुरू होण्याची संख्यादेखील कमी होत चाचली आहे. दरवर्षी या उद्योगास कामगारांचा तुटवडा भासत आहे.
फसवणुकीचे प्रकार
शिराळा तालुक्यात चांगल्या प्रतीचा गूळ तयार होतो. गुळाला सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथे मोठी बाजार पेठ आहे. या ठिकाणी गुळाला दरही चांगला मिळतो. यामुळे गुऱ्हाळघरे सुरू करण्यासाठी गुऱ्हाळ घरमालक धडपड करत आहेत. मात्र, कामगार मिळत नसल्याने परिसरात जाऊन कुशल कामगाराच्या शोधात आहेत. जरी कामगार मिळाले, तर त्यांना अगोदर उचल द्यावी लागते, तर कामगार गुऱ्हाळघरामध्ये कामाला येतो. मात्र, यंदा वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कामगारांना गुऱ्हाळमालकांनी उचल दिली आहे; मात्र अद्यापही कामगार आलेले नाहीत. अनेक गुऱ्हाळमालकांची फसवणूक झाली आहे. यामुळे हा उद्योग भविष्यात टिकणार का, हा चिंताजनक विषय बनला आहे.