पाडव्यानिमित्त गूळ सौद्याचा केवळ मुहूर्तच

गुळ
गुळ

कोल्हापूर: गुळाच्या मुहूर्ताच्या सौद्यास आज (ता. २०) येथील बाजार समितीत प्रारंभ होत असला, तरी जोरदार पावसाने अद्याप ही गुऱ्हाळे सुरू झाली नाहीत. यामुळे प्रत्यक्षात गूळ येण्यास अजून पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. बाजार समितीत प्रत्येक वर्षी दीपावली पाडव्यानिमित्त मुहूर्ताचे सौदे निघतात; मात्र यंदा पाडव्यानिमित्त गूळ सौद्याचा केवळ मुहूर्तच होईल, अशी शक्यता आहे.  गेल्या काही वर्षांत परतीच्या पावसाने एखादा आठवड्याचा विलंब गूळनिर्मितीसाठी व्हायचा. यंदा सलग पंधरा दिवस दररोज जोरदार पाऊस झाल्याने गुऱ्हाळघरांचे वेळापत्रकच विस्कळित झाले आहे. गुऱ्हाळघराला जाणाऱ्या ऊस शेतीतही पाणी साचून राहिल्याने अद्याप ऊसतोडणीसाठी वाफसा नाही. पाऊस थांबून दोन तीन दिवस झाले; तरीही शेतातून पाणी हटत नसल्याची परिस्थिती आहे. ऊसतोडणीसाठी पूर्ण वाफसा येण्यास आणखी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे गूळ उत्पादकांनी सागितले. यामुळे स्वत:च्या शेतातील उसाचे गुऱ्हाळघरासाठी गाळप करणेही अशक्‍य असल्याचे गुऱ्हाळमालकांचे म्हणणे आहे.  गुऱ्हाळच्या भोवताली सर्वत्र ओलसरपणा असल्याने जळण काढणे, ते सुरक्षित ठेवणे आव्हान ठरत आहे. जोरदार पावसामुळे तातडीने गूळनिर्मिती होणे सध्या तरी शक्‍य नसल्याचे गूळ उत्पादकांनी सांगितले. गुळाची नियमित आवक होण्यास नोव्हेंबरच उजाडेल, असा अंदाज गूळ उत्पादकांचा आहे. यामुळे पाडव्यानिमित्त केवळ मुहूर्तच होईल, प्रत्यक्षात यंदाचा गूळ नियमित येण्यास नोव्हेंबर उजाडण्याची शक्‍यता बाजार समितीतून व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com