पुणे ः भूजलपातळी वाढविण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात डिसेंबरअखेरपर्यंत निवडलेल्या १९० गावांपैकी ११२ गावांत ६६४१ कामे पूर्ण झाली आहेत; तर ६९ गावांत प्रकल्प आराखड्यानुसार ८० टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण झाली आहेत. त्यावर १२६ कोटी १९ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यात १९० गावांची निवड करण्यात आली होती. निवड केलेल्या गावांचा गाव आराखडा तयार करून त्याला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांनी मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्षात कामास सुरवात झाली होती. सध्या निवडलेल्या गावांत ६६४१ कामे पूर्ण झाली आहेत. ४७४ कामे प्रगतिपथावर आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात एकूण ७११५ कामे पूर्ण होणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी २४७ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे.
मागील दोन वर्षांपासून पुणे विभागात जलयुक्त शिवार अभियानाची योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत २०१८-१९ पर्यंत सर्व गावे टंचाईमुक्त करण्याचे शासनाचे धोरण आहे. या योजनेअंतर्गत पडलेल्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी पाणलोटची कामे हाती घेण्यात आली आहेत. दरवर्षी या योजनेतून सिमेंट साखळी नालाबांध बांधणे, जुने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध, केटी वेअरची दुरुस्ती व नूतनीकरण करणे, जलस्रोतांतील गाळ काढणे, जलस्रोत बळकटीकरण करणे, विहीर पुनर्भरण, ओढे, नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करणे, अशी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.
प्रकल्प आराखड्यानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण झालेली गावांची संख्या अवघी ९ एवढी आहे. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.