नांदेड : जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत २०१७-१८ मध्ये निवड झालेल्या जिल्ह्यातील १८३ गावांमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या ५४२४ कामांपैकी २७०८ कामे पूर्ण झाली आहेत. ३८० कामे सुरू आहेत. उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे घेण्यात आली. या वेळी श्री. डोंगरे यांनी निर्देश दिले.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये २२६ गावांमध्ये ८५५२ कामे पूर्ण झाली आहेत. २०१७-१८ मध्ये निवड झालेल्या १८३ गावशिवारात प्रस्तावित ५४२४ कामांपैकी एकूण २७०८ कामे पूर्ण झाली असून, ३८० कामे सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या जलसंधारणाच्या कामांमुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सिंचनासाठी संरक्षित पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. असे या वेळी सांगण्यात आले.
या वेळी सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे, डॉ. सचिन खल्लाळ, व्ही. एल. कोळी, एन. एच. गायकवाड, प्रभोदय मुळे, सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी तसेच जिल्हा, तालुका विभागप्रमुखांची या वेळी उपस्थिती होती.