नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील वर्षात निवड झालेल्या गावांच्या मंजूर आराखड्यानुसार ८९०९ कामांपैकी सध्या १९६१ कामे सुरू आहेत. आतापर्यंत ३७१ कामे पूर्ण झाली आहेत. मागील दोन वर्षांतील निवडलेल्या गावांतील कामे पूर्ण केल्यानंतर आता गतवर्षी निवड झालेल्या गावांतील कामे वेगाने करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानातून कामे करण्यावर भर दिला जात आहे. मागील दोन वर्षांत (२०१५-१६ व २०१६-१७) झालेल्या कामाचे परिणामही आता दिसत आहेत. अभियानात पहिल्या वर्षी २७९, दुसऱ्या वर्षी २५६ गावे निवडली गेली. या दोन वर्षांत जवळपास ३२५ कोटींची २५ हजारांवर कामे केली गेली. लोकसहभाग वाढल्याने कामांना गती आली.
या दोन वर्षांतील कामे अजून काही ठिकाणी सुरू आहे. यंदाच्या मार्च अखेरपर्यंत दोन वर्षांतील मंजूर कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते, मात्र कामे झाली नसल्याने ती करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे.
गेल्यावर्षी (२०१७-१८) २४१ गावांची निवड करण्यात आली असून, या गावांत कामे करण्यासाठी १८५ कोटी रुपयांची कृषी विभागाची ५८२९, लघुसिंचन (जिल्हा परिषद) ची २५७, रोजगार हमी योजनेची ५११, लघुसिंचनची (जलसंधारण) १२४, वनविभागाची १२९१ व सामाजिक वनीकरणाची ७१६ कामे मंजूर केली आहे.
८७७२ कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिलेली आहे. ३२४१ कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, ९४ लाख रुपयांच्या ४८२० कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. सध्या १९६१ कामे सुरू असून ३७१ कामे पूर्ण झाली आहेत, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.