नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या वर्षी (२०१७-१८) निवडलेल्या २४१ गावांत सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील कामांची गती आता वाढली आहे. सध्या जिल्ह्यात ७४२८ कामे सुरू आहेत. आतापर्यंत या कामांवर ४३ कोटी ८ लाख रुपये खर्च झाले आहेत. पावसाळा आठ दिवसांवर आला असल्याने जास्तीत जास्त कामे उरकण्यावर प्रशासानाचा भर आहे.
नगर जिल्ह्यातील २४१ गावांची मागील वर्षी जलयुक्त शिवार अभियानात निवड झाली आहे. या गावात आराखड्यानुसार ८९०९ कामे मंजूर आहेत. मागील दोन वर्षांत निवडलेल्या गावांतील कामे पूर्ण केल्यानंतर आता गतवर्षी अभियानात निवड झालेल्या गावांतील कामे वेगाने करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून कामे करण्यावर भर दिला जात आहे. मागील दोन वर्षांत (२०१५-१६ व २०१६-१७) झालेल्या कामाचे परिणामही आता दिसत आहेत. अभियानात पहिल्या वर्षी २७९, दुसऱ्या वर्षी २५६ गावे निवडली गेली. या दोन वर्षांत जवळपास ३२५ कोटींची २५ हजारांवर कामे केली गेली. लोकसहभाग वाढल्याने कामांना गती आली. या दोन वर्षांतील कामे अजून काही ठिकाणी सुरू आहे. यंदाच्या मार्च अखेर दोन वर्षांतील मंजूर कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते, मात्र कामे झाली नसल्याने ती करण्यासाठी मुदत वाढ दिलेली आहे.
गेल्या वर्षी (२०१७-१८) निवड झालेल्या २४१ गावांत तब्बल १९७ कोटी पाच लाख ८९ हजार रुपयांची ८१५३ कामे मंजूर झाली. ही कामे आता वेगाने सुरू आहेत. पावसाळा तोंडावर आला असल्याने जास्तीत जास्त कामे उरकण्यावर भर राहणार आहे. आतापर्यंत ७४२८ कामे सुरू असून, त्यातील ४१४६ कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत या कामांवर ४३ कोटी ८ लाख रुपये खर्च झाले आहेत. कामे लवकर व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
यंत्रणानिहाय सुरू असलेली ‘जलयुक्त’ची कामे ः कृषी विभाग ः ५४००, लघुसिंचन ः २४८९, नरेगा ः ४५२, लघुसिंचन जलसंधारण ः ७८, वन ः ११५५, सामाजिक वनीकरण ः १५, इतर ः १८१.