सांगली ः जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून कामे झाल्याने दुष्काळी भागातील शेतीला फायदा झाला आहे. यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्ह्यात तीन वर्षांत १० हजार ८८ गावांमध्ये या योजनेतून कामे पूर्ण झाली आहेत. २०१८-१९ या वर्षाकरिता जलयुक्त शिवार योजनेसाठी नवीन गावांची निवड करण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जलयुक्त शिवार योजना जिल्ह्यात गावोगावी पोचली आहे. या योजनेसाठी शेतकरीही पुढाकार घेत आहेत. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील ४२१ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. यामधील एकूण १० हजार ६४० कामांपैकी १० हजार ८८ कामे पूर्ण झाली आहेत. ५५२ कामे सुरू आहेत. ती मार्चअखेरपर्यंत पूर्ण करायची असल्याने शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
जलयुक्त शिवार योजना राबविण्याठी महसूल, कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा लघू पाटबंधारे विभाग, वन विभाग, पाटबंधारे विभाग यांसह संस्था पुढाकार घेत आहेत. जिल्ह्यात ही योजना सुरू झाल्यापासून २०१५-१६ मध्ये ५१० मिमी पावसाची नोंद झाली, त्यातून या कामांत ५०,१२५ टीसीएम पाणीसाठा झाला. त्यापैकी २५,०७६ टीसीएम पाण्याचा वापर शेतीसाठी करता आला आहे.
चालू वर्षी भूजल सर्वेक्षणाच्या अहवालानुसार ०.६४ मीटरने पाणीपातळी वाढली आहे. जलयुक्त शिवार योजनेचे अंतिम ध्येय संरक्षित सिंचन क्षेत्र वाढविणे आहे. या दोन वर्षांतील सिंचन क्षेत्रातील वाढ पाहता पहिल्या वर्षांत २५ हजार ०७६ हेक्टर तर दुसऱ्या वर्षात १४ हजार २९१ हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. २०१७-१८ या वर्षात झालेल्या कामातून किती क्षेत्र सिंचनाखाली आले आहे, हे मार्च अखेरीस स्पष्ट होईल.
२०१८-१९ या शेवटच्या वर्षासाठी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेसाठी गाव निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या गावांचा पूर्वी जलयुक्त शिवार योजनेत समावेश नव्हता, अशा गावांचा समावेश होणार आहे.