वाशीम : टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ७६७६ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे संरक्षित सिंचन क्षमतेत वाढ होण्यास मदत झाली अाहे.
अभियानाच्या पहिल्याच वर्षी म्हणजेच २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांची अभियानात निवड करण्यात आली होती. यामध्ये वाशीम तालुक्यातील २६, रिसोड तालुक्यातील २७, मालेगावातील २५, मंगरूळपीरमधील २७, मानोरा तालुक्यातील ६१ व कारंजा तालुक्यातील ३४ गावांचा समावेश होता. या गावांमध्ये ५ हजार ५८ कामे पूर्ण करण्यात आली.
२०१६-१७ मध्ये जिह्यातील १४९ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. यात वाशीम तालुक्यातील २४, रिसोड तालुक्यातील १७, मालेगाव तालुक्यातील २४, मंगरूळपीर तालुक्यातील ३१, मानोरा तालुक्यातील २१ व कारंजा तालुक्यातील ३२ गावांचा समावेश होता. या गावांमध्ये दोन हजार १२ कामे पूर्ण झाली. २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून प्रत्येकी २० गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये आतापर्यंत ६०६ कामे पूर्ण झाली.
जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस होऊनसुद्धा जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांमध्ये साठलेल्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना खरीप हंगामात झाला. या कामामध्ये जमा झालेल्या पाण्यातून शेतकऱ्यांनी पावसाच्या खंडकाळात सोयाबीन, तूर पिकासाठी सिंचन केल्याने ही पिके तग धरू शकली. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यास मदत झाली.
लोकसहभागातून ८१ कामे झाली पूर्ण
जलयुक्त शिवार अभियानाची उपयुक्तता व त्यामुळे मिळणारे प्रत्यक्ष फायदे लक्षात आल्यामुळे यास मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाला आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात लोकसहभागातून सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याची सुमारे ४७ कामे करण्यात आली. याद्वारे ५ लाख घन मीटरपेक्षा अधिक गाळ उपसण्यात आला.
तसेच २०१६-१७ मध्ये लोकसहभागातून गाळ उपसण्याची ३४ कामे पूर्ण झाली. त्याद्वारे सहा लाख घन मीटरपेक्षा अधिक गाळ काढण्यात आला. हा गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने आपल्या शेतामध्ये नेऊन टाकल्याने त्यांच्या जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली. गाळ उपसा केल्याने प्रकल्पातील पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्यास मदत झाली.