सातारा : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतंर्गत असलेली कामे मुदतीत पूर्ण करण्यास गती आली आहे. या योजनेतंर्गत २०१६-१७ मधील ४६८४ तर २०१७-१८ मधील २७८ अशी एकूण ४९६२ कामे पूर्ण झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात (२०१६-१७ मध्ये) २१० गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. या गावांमध्ये एकूण ५४४८ कामे निश्चित करण्यात आली होती. या कामांसाठी १९७ कोटी २६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. या सर्व कामांचा शासकीय यंत्रणांमार्फत आराखडा तयार करण्यात आला होता.
त्यामध्ये सिमेंट नालाबांध, माती नालाबांध, सिमेंट बंधारे, वळण बंधारे, शेततळे, पाझरतलाव दुरुस्ती, सलग समतल चर, भूजल पुनर्भरण, ठिबक, तुषार सिंचन, दुरुस्तीची कामे, नदी पुनरुज्जीवन आदी कामे हाती घेतली गेली. आजवर ४६८४ कामे पूर्ण झाली असून ३८९ कामे प्रगतिपथावर आहेत. पूर्ण झालेली व प्रगतिपथावर असलेल्या कामांसाठी आतापर्यंत १०८ कोटी १६ लाख रुपये खर्च झाले आहेत.
२०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २१० गावांची निवड करण्यात आली असून या गावांमध्ये ३७८४ कामे निश्चित करण्यात आली आहेत. या कामांसाठी १०९ कोटी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. एकूण कामांपैकी आज अखेर २७८ कामे पूर्ण झाली असून ८४ कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांसाठी तीन कोटी १० लाख रुपये खर्च झाला आहे.