औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा अपेक्षित सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०४ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र हरभरा व रब्बी ज्वारीचे आहे. सध्या या पिकांच्या काढणीला वेग आला आहे.
मराठवाड्यात यंदा खरिपाची पिके पावसाअभावी हातची गेली. त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बी भरून निघेल, अशी आशा निर्माण झाली. परंतु औरंगाबाद वगळता जवळपास सर्वच जिल्ह्यांत यंदा गारपिटीने रब्बी पिकांचे नुकसान झाले. जवळपास पावणेदोन लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एकीकडे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच दुसरीकडे पक्व झाल्याने रब्बी ज्वारी व हरभऱ्याच्या काढणी व मळणीच्या कामाला वेग आला आहे.
मराठवाड्यात यंदा ४ लाख २६ हजार २५२ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी अपेक्षित असताना दुपटीपेक्षा जास्त क्षेत्रावर अर्थात ९ लाख ७ हजार ८० हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली होती. दुसरीकडे रब्बी ज्वारीची ८ लाख ९६ हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित असताना, सर्वसाधारण क्षेत्राच्या ७१ टक्के क्षेत्रावर म्हणजे ६ लाख ३६ हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली होती.
या पिकांपाठोपाठ गव्हाची २ लाख ६५ हजार, मक्याची ४२ हजार ४४७, रब्बी तिळाची ६९, करडईची २८ हजार २३५, जवसाची २२३२, सूर्यफुलाची ३८२३ हेक्टरवर पेरणी झाली होती. रब्बी ज्वारी व हरभरा ही दोन मोठी पिके पक्वतेमुळे काढणीच्या अवस्थेला आली आहेत.
गहू पीक काही ठिकाणी पक्वतेच्या तर काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहे. करडईचे पीकही काढणीच्या अवस्थेत आहे. मक्याचे पीक पक्वतेच्या अवस्थेत आले असून, काही ठिकाणी मकाचीही काढणी सुरू झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.