जिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण चार लाख चार हजार ७३ हेक्टरपैकी दोन लाख ७५ हजार ७५२ हेक्टर म्हणजेच ६८ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत खरीप हंगाम प्रामुख्याने असतो. त्यामुळे रब्बी हंगामात या तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पेरणी झाल्याचे दिसून येते.
पूर्वेकडील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. सध्या रब्बी ज्वारी, हरभरा वगळता गव्हाचे पीक अनेक ठिकाणी उभे आहे. जिल्ह्यात रब्बी ज्वारीची एक लाख ५७ हजार ८१०, तर हरभऱ्याची ४७ हजार ३२० हेक्टरवर पेरणी झाली आहे.
रब्बी ज्वारी पेरणीत जुन्नर, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, पुरंदर हे तालुके आघाडीवर आहेत. जिल्ह्यात शिरूर तालुक्यात सर्वाधिक ३५ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. त्या खालोखाल बारामती, पुरंदर तालुक्यांतही पेरणी झाली असून, या भागातच काढणीची कामे वेगात सुरू आहेत. जुन्नर, खेड, शिरूर, बारामती, दौंड, पुरंदर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी झालेली आहे. बारामतीमध्ये १४ हजार ७८० तर जुन्नरमध्ये १२ हजार ४०० हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.
पावसाळ्याच्या शेवटी बराच काळ वाफसा न झाल्यामुळे आणि बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाल्यामुळे ज्वारीऐवजी गहू आणि हरभरा पिकास शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येते. त्यामुळे गहू, हरभरा पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा रब्बी ज्वारीचे क्षेत्र अवघे ५८ टक्के आहे. गव्हाचे ८०, तर हरभऱ्याचे ९८ टक्के क्षेत्र आहे. त्यातच कीड-रोगाचा फारसा प्रादुर्भाव न झाल्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
याबाबत न्हावरे (ता. शिरूर ) येथील गीताराम कदम म्हणाले, की मी तीन एकरावर ज्वारीचे पीक घेतले. त्याची चार ते पाच दिवसांपूर्वी काढणी केली. तसेच दोन एकर हरभरा होता, त्याचीही काढणी केली आहे.