कृषिसेवक भरतीचा घोळ यंदाही कायम

कृषिसेवक भरतीचा घोळ यंदाही कायम

पुणे : कृषिसेवक परीक्षेत घोटाळा झाल्यानंतर आता नव्याने होणाऱ्या ऑनलाइन परीक्षा प्रक्रियेतदेखील घोळ झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. एका विद्यार्थ्याने कोणत्याही एकाच विभागात परीक्षा देण्याचा नियम असतानाही तीन विभागांमध्ये अर्ज भरून एकापेक्षा जास्त हॉल तिकिटे काहींना वाटली गेली आहेत. नियमाला हरताळ फासून काही जण अनेकवेळा परीक्षा देण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाल्यामुळे नियमांचे पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, ही परीक्षा घेताना मोठी चूक महापरीक्षा कक्षाकडून केली जात आहे. एका विद्यार्थ्याने एकाच विभागात परीक्षा देण्याची अट होती. मात्र, स्वतंत्र ‘यूजर नेम’ व ‘ई-मेल’ टाकून अनेक विद्यार्थ्यांना विविध विभागांत अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे शासनाची अट निमूटपणे पाळून फक्त अर्ज भरलेल्या विद्यार्थ्याला एक हॉल तिकिट मिळाले आहे. त्याला परीक्षादेखील एकाच ठिकाणी देता येईल.

"महापरीक्षा कक्षाची अट झुगारून अनेक ठिकाणी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना मात्र तीन हॉल तिकिटे मिळाली आहेत. असे विद्यार्थी अनेक ठिकाणी परीक्षा देण्यास पात्र असून, त्यातून अनावश्यक अशी स्पर्धा तयार होणार आहे. १३, १४ व १५ मार्च रोजी या परीक्षा होत असून, हा घोळ न मिटविल्यास न्यायालयात जावे लागेल, असा इशारा काही विद्यार्थ्यांनी दिला आहे.

दरम्यान, या गोंधळाबाबत राज्याच्या कृषी खात्याने कानावर हात ठेवले आहेत. ‘या परीक्षेत कृषी आयुक्तालयाचा अथवा कृषी विभागाचा कोणताही सहभाग नाही. राज्य शासनाच्या आयटी विभागाकडून याबाबत नियम तयार करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास त्यांनी ई-महापरीक्षा पोर्टलशी संपर्क (१८००-३०००-७७६६) साधावा, असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

ई-महापरीक्षा पोर्टलशी काही विद्यार्थ्यांनी संपर्क साधला असता यात पोर्टलचा नव्हे, तर तीन ठिकाणी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचाच दोष असल्याचे सांगण्यात आले. ‘‘पोर्टलमधील कर्मचाऱ्यांना कोणताही अर्ज ‘एडिट’ करण्याचा पर्याय देण्यात आलेला नव्हता. अर्ज चुकीचा भरला, पण पेमेंट केले नसल्यास दुसरा अर्ज भरण्याची संधी होती. मात्र, काहींनी दुहेरी ‘लॉगइन’ व ‘ई-मेल’ आयडी वापरून एकापेक्षा जास्त अर्ज भरले. यात महापरीक्षा पोर्टलची काहीही चूक नाही,’’ असे पोर्टलचे म्हणणे आहे.

कृषिसेवक पदासाठी कृषी खात्याने याआधीची घेतलेली ७३० जागांची परीक्षा घोटाळ्यांमुळे विधिमंडळातदेखील गाजली होती. त्या वेळच्या घोटाळ्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जबाबदार असल्याचा आरोप करीत कृषी आयुक्तालयाचे आस्थापना सहसंचालक सुधीन ननावरे यांनी परीक्षा परिषदेवर पुण्याच्या बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल केला आहे. राज्य सरकारचीदेखील या प्रकरणात बदनामी झाल्यामुळे आता नव्या ९०३ जागांच्या भरतीपासून परीक्षा परिषद बाजूला ठेवण्यात आले आहे. नवी परीक्षा महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या अख्यत्यारीत घेतली जात आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या महापरीक्षा कक्षाची मदत घेतली जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com