अग्रणी नदी बारमाही करा

अग्रणी नदी बारमाही करा
अग्रणी नदी बारमाही करा

सांगली ः खानापूर तालुक्‍याला वरदान ठरणारी अग्रणी नदी बारमाही करावी, अशी मागणी गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. ही नदी बारमाही झाली तर खानापूर तालुक्‍यातील पाणी प्रश्‍न कायमचा मिटेल. मात्र, अद्यापही ही नदी बारमाही करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पावले उचलली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी लढा उभारला जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खानापूर तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. केवळ पावसाळ्यात अग्रणी नदीला पाणी असते. मात्र, हे पाणी तालुक्‍याला अपुरे पडते. पाणीटंचाई असल्याने शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पावसाचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. खानापूर तालुक्‍यातील अग्रणी नदी बारमाही करावी, अशी मागणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केली होती. त्याचा विचारदेखील लोकप्रतिनिधींनी केला. मात्र, तासगावच्या पूर्व भागात पाणी टंचाई असल्याने राजकीय नेत्यांनी २०३ कोटी रुपये खर्च करून पुनदी-विसापूर योजना सुरू केली, याचाच अर्थ, ही नदी सहजरीत्या बारमाही होत असताना आपली ‘वोट बॅंक’ कायम करण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष केले.  दरम्यान, ही नदी कशी बारमाही होईल, याचा अभ्यास पाटबंधारे विभागाला करण्यास सांगितला गेला. त्यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी अग्रणी नदीत सोडले तर ही नदी बारमाही होईल, असे अभ्यासातून समोर आले. त्यासाठी भूड (ता. खानापूर) येथे टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाचव्या टप्प्यातून हे पाणी देता येईल, यावर शिक्कामोर्तब झाला. तीन वर्षांपूर्वी ही नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी जिल्हा प्रशासन, ग्रामस्थ, आणि काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. त्यामुळे नदीचे पात्र विस्तारले. या नदीवर जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सुमारे ३६ बंधारे बांधण्यात आले. त्यानंतर चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदीत पाणीसाठा झाला, परिणामी पाणी प्रश्‍न मिटला. परंतु त्यांनतर ही नदी कोरडीच पडली आहे. त्यामुळे याभागातील पाणी टंचाई सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढे आले पाहिजे. यासाठी तालुक्‍यातील शेतकरीदेखील मदत करण्यास तयार आहेत. मात्र, नदी बारमाही झाली नाही तर लढा उभारू, अशी चर्चा शेतकऱ्यांत सुरू आहे. पाइपलाइनसाठी निविदा टेंभू उपसा सिंचन योजनेच्या भूड येथील पाचव्या टप्प्यातून अग्रणी नदी बारमाही करण्याचे नियोजन केले आहे. या टप्प्याची उंची २० मीटरने वाढवली आहे. त्यानुसार १२०० मीटर पाइपलाइन करावी लागणार आहे. त्यासाठीची निविदा काढली असल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून अग्रणी नदी बारमाही करण्याचे आश्‍वासन दिले जाते आहे. मात्र, अद्यापही त्यावर मार्ग काढलेला नाही. त्यामुळे अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी आम्ही लढा उभा करू. - संपतराव पवार, बलवडी, ता. खानापूर, जि. सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com