कोल्हापूर : गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने शेतकऱ्यानी नि:श्वास टाकला अाहे. आता खरीप काढणीची कामे वेगाने सुरू आहेत.
ज्या शेतात वाफसा येईल त्या शेतात तातडीने कापणी व मळणी करून पीक सुरक्षित ठेवण्यासाठी धडपड सुुरू आहे. यामुळे येत्या आठ ते दहा दिवसांत खरीप कापणीला पुन्हा वेग येईल अशी शक्यता आहे.
जिल्ह्यात आक्टोबरचा पहिला पंधरवडा पूर्णपणे पावसाळी गेला आहे. दररोज एक ते दोन तास पडणाऱ्या पावसाने अनेक शिवारांत पाणी साचून राहिले. माळरानेही पाझरत असल्याने माळरानातील खरीप काढणीही खोळंबली. मध्यम व काळ्या प्रतीच्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांची तर खूपच बिकट अवस्था झाली.
अगोदरच वेळाने होणारा निचरा व त्यात दररोज जोरदार पडणारा पाऊस यामुळे खरिपाची काढणी पूर्णपणे ठप्प झाली. सोयाबीन, भुईमूग पीक कुजण्याचा धोका निर्माण झाला. अनेक ठिकाणी शेतात सोयाबीन खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांना एक रुपयाही उत्पादन मिळाले नसल्याची स्थिती आहे.
कापणीच्या अवस्थेतील पिकात आठ ते दहा दिवस पाणी साचून राहिल्याने पूर्ण पीकच नष्ट झाल्याची स्थिती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक भागात आहे. नफा तर सोडाच; पण बऱ्याच शेतकऱ्यांना पदरमोड करून खरीप पिकांची मळणी करावी लागत आहे.
अाता रब्बीच्या पेरण्या सुरू
सध्या वाफसा येत असल्याने खरिपाची आशा सोडून रब्बीच्या दृष्टीने तयारी करणे, अथवा नवीन ऊस लावणीसाठी शेत तयार करणे, या उद्देशाने शेतकरी खरिपाचे पीक काढून शेताची मशागत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दृश्य जिल्ह्यातील शिवारात आहे.
गेल्या चार दिवसांपासून स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने याचा फायदा वाफशासाठी होत आहे. यामुळे येत्या आठ दिवसांत खरिपाच्या काढणीला वेग येऊन रब्बीच्या पेरण्याही सुरू होतील, अशी शक्यता कृषी विभाग व शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात आली.