औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत येत्या खरीप हंगामासाठी ९९ कोटी ८४ लाख २६ हजार रुपये म्हणजेच केवळ २ टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाला जूनपर्यंत अपेक्षित उद्दिष्टानुसार कर्जपुरवठा करणे शक्य होईल का हा खरा प्रश्न आहे.
येत्या खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्जवाटपाच्या लक्षांकात ६७ टक्के कर्जवाटपाची जबाबदारी राष्ट्रीयीकृत बॅंकांवर सोपविण्यात आली आहे. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामासाठी ४८३२ कोटी ५३ लाख ६० हजार रुपयांचा पीक कर्जपुरवठा करण्याचा लक्ष्यांक ठरविण्यात आला आहे.
त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी ११५९ कोटी ४८ लाख ७० हजार, जालना जिल्ह्यासाठी १२४३ कोटी ६० लाख ७८ हजार, परभणी जिल्ह्यासाठी १४७० कोटी ४४ लाख १२ हजार रुपये तर ९५९ कोटी रुपयांच्या पीककर्ज पुरवठ्याचा समावेश आहे.
बॅंकनिहाय कर्ज वाटपाच्या लक्ष्यांक मध्ये चारही जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ८०० कोटी ६४ लाख ४२ हजार रुपये, व्यापारी बॅंकांना ३४०१ कोटी ५८ लाख ७१ हजार रुपये तर ग्रामीण बॅंकांना ६३० कोटी ३० लाख ४७ हजार रुपये पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक ठरविण्यात आला आहे.
मिळालेल्या लक्ष्यांकनुसार औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी ६.१५ टक्के लक्षांकपूर्ती करत २१,३७१ शेतकऱ्यांना ४९ कोटी २२ लाख ६५ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे.
गतवर्षी जिल्हा सहकारी बॅंकांनी चारही जिल्ह्यांत याचवेळी १८६ कोटी ९२ लाख ६८ हजार रुपयांचे कर्जवाटप केले होते. दुसरीकडे व्यापारी बॅंकांनी केवळ ०.५१ टक्के लक्षपूर्ती करताना १५१२ सभासदांना केवळ १७ कोटी ३६ लाख ३३ हजार रूपयांचे कर्जवाटप केले. यातुलनेत याचवेळी गतवर्षी व्यापारी बॅंकांनी मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ४४ कोटी ५५ लाख ३९ हजार रुपयांचे कर्जवाटप केले होते.
ग्रामीण बॅंकांनी ५.२८ टक्के लक्ष्यांक पूर्ती करताना ३५०३ शेतकऱ्यांना ३३ कोटी २५ लाख २८ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. गतवर्षी ग्रामीण बॅंकांनी याचवेळी १५ कोटी ६१ लाख ५८ हजार रुपयांचे कर्जवाटप केले होते.