बुलडाणा ः गेल्या हंगामात बीटी कपाशीवर झालेला बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहता या वेळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता अाहे. त्यामुळे जिल्हा कृषी विभागाने सोयाबीनचे वाढीव क्षेत्र लक्षात घेता बियाण्यांचे नियोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या अाढावा बैठकीत यादृष्टीने सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बुलडाणा जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सात लाख ३२ हजार हेक्टर अाहे. यामध्ये सोयाबीनचे सरासरी क्षेत्र दोन लाख ८८ हजार ५१३ हेक्टर अाहे. दरवर्षी यापेक्षा अधिक लागवड होत असते. गेल्या हंगामात जिल्ह्यात कपाशीची लागवड वाढली होती. परंतु बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण हंगामाच अडचणीत सापडला होता. सोयाबीनकडून कपाशी लागवडीकडे वळालेले शेतकरी येत्या हंगामात पुन्हा सोयाबीनची लागवड वाढवतील, असा अंदाज असून, किमान १० टक्के वाढ गृहीत धरली जात अाहे.
या हंगामासाठी प्रशासनाने तसे नियोजन केले. जिल्ह्यात हंगामासाठी दोन लाख ६३ हजार ३० क्विंटल बियाणे लागेल. कपाशीचा पेरा होणार असून, यासाठी अाठ लाख ११ हजार ५०० बियाणे पाकिटांची मागणी करण्यात अाली. हंगामात लागवड होणाऱ्या पिकांसाठी एक लाख ३७ हजार ६६० मेट्रिक टन खतांचे अावंटन मंजूर झाले अाहे. त्यापैकी विविध खतांचा २० हजार ७९२ मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला अाहे. मागणीनुसार खतांचा कुठलाही साठा कमी राहणार नाही, असे नियोजन झाले अाहे.
हंगामात बोगस बियाण्यांचे वितरण, लिंकिंगसारखे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथक काम करणार अाहे. यासाठी एक पूर्णवेळ निरीक्षक नेमण्यात अाले असून, जिल्हा परिषद व राज्याच्या कृषी विभागाचे ३७ असे एकूण ३८ निरीक्षक हे काम पाहणार अाहेत.