अकोला : जिल्हा कृषी महोत्सवाला झालेला विलंब, वनविभागाकडून गाळ घेऊन जाणाऱ्या वाहनांची अडवणूक, गेल्या हंगामात कृषी विभागाने बोगस बियाणे, खत विक्रीसाठी केलेली कारवाई, लोकप्रतिनिधींबाबत असलेली श्रेयनामावली (डेकोरम) न पाळणे या मुद्यावर खरीप अाढावा बैठकीत घमासान चर्चा झाली.
अकोला येथे खरीप हंगाम आढावा बैठकीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन करण्यात आले. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोदे, अामदार हरीश पिंपळे, अामदार गोपिकिशन बाजोरीया, जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम उपस्थित होते.
बैठकीत गेल्या महिन्यात अायोजित करण्यात अालेल्या कृषी महोत्सवाच्या अायोजनावरून अामदार पिंपळे, अामदार बाजोरीया यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. यामध्ये प्रामुख्याने या कृषी महोत्सवाच्या अायोजनातून नेमके काय साध्य झाले, किती शेतकऱ्यांना महोत्सवाचा फायदा झाला, कुठले तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिले गेले, रखरखत्या उन्हात महोत्सव घेण्यामागील कारण काय, अायोजनास विलंब का झाला, अशा विविध प्रश्नांनी सभागृहात अधिकारी घामाघूम झाले. यापैकी अनेक प्रश्नांची उत्तरे योग्य पद्धतीने अधिकाऱ्यांना देता अाली नाहीत. पालकमंत्री डॉ. पाटील यांनीसुद्धा नाराजीचा सूर मांडत अायोजनासाठी निधी येऊनही विलंब होण्याचे कारण काय याबाबत विचारणा केली.
अामदार बाजोरीया यांनी लोकप्रतिनिधीबाबत असलेला ‘डेकोरम’ नियोजन करताना पाळला नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत थेट निमंत्रण पत्रिकाच सादर केली. जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोदे यांनी निमंत्रण पत्रिकेत अापले साधे नावही नसल्याची बाब पालकमंत्र्यांकडे मांडली. चुकीच्या नियोजनाबाबत चौकशीला तुम्हाला सामोरे जावे लागेल असा इशाराच डॉ. पाटील यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांनीही यापुढे कुणी अशी चूक केली तर कारवाई करू असे सांगितले.
वन विभागाच्या जागेतून गाळ नेणारी वाहने अडविली जाणे, प्रकल्पाच्या बॅक वॉटर क्षेत्रात लागवड केलेली पिके उद्ध्वस्त करणे हेही मुद्दे प्रामुख्याने गाजले. गेल्यावेळी बोगस बियाणे व खते विक्रीचे प्रकार झाले. हा प्रकार वर्षभरापासून सुरू असताना कारवाईला विलंब होण्याचे कारण काय असेही लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांना विचारले. या हंगामासाठी धडक कारवाईचे नियोजन केले जावे असे निर्देश देण्यात अाले. पेरणीपूर्वी अारोग्य पत्रिकांचे वाटप झालेच पाहिजे, त्यासाठी हव्या त्या उपाययोजना करा असे पालकमंत्र्यांनी सुचविले. यावेळी श्री. निकम यांनी खरीप हंगाम नियोजनाचे सादरीकरण करीत माहिती दिली.