बीटी बियाणे पाकिटासोबत कामगंध सापळे देणे सक्तीचे करणार ः फुंडकर

खरीप आढावा बैठक
खरीप आढावा बैठक

बुलडाणा : आगामी खरिपात बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने बियाणे कंपन्यांना बियाणे पाकिटांसोबत कामगंध (फेरोमोन) सापळे देणे सक्तीचे केले आहे, अशी माहिती कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

बुलडाणा जिल्ह्याची खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक रविवारी (ता. ८) झाली. या वेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, अॅड. आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. नेमाणे, विभागीय सहसंचालक सुभाष नागरे उपस्थित होते.

बोंड अळी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी, याकरिता गावोगावी सभा घेण्यात येणार असल्याचे सांगत श्री. फुंडकर म्हणाले, की शेतकऱ्यांना कमी कालावधीत येणाऱ्या कापूस बियाण्यांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. हंगामपूर्व कापूस लागवड न करण्यासाठीसुद्धा शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जाईल. त्याचप्रमाणे बोगस बियाणे, खत व कीटकनाशकांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची तक्रार आल्यास शेतकऱ्यांना त्वरित कार्यवाहीसाठी मदत करण्यात येईल.

येत्या खरिपात होणारी पेरणी लक्षात घेता कुठल्याही प्रकारची बियाणे, खते टंचाई निर्माण होणार नाही, याबाबत नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना खरिपातील पेरणीसाठी पेरणीपूर्वी पीककर्ज मिळायला पाहिजे. त्यासाठी बॅंकांनी योग्य ती सर्व व्यवस्था उभारावी. कुठलाही पात्र शेतकरी बँकांनी पीक कर्जाशिवाय परत पाठवू नये.

एकरकमी कर्जमाफी योजनेमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त संख्येने सामावून घ्यावे. त्यांना या योजनेचा लाभ द्यावा. उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानातंर्गत शेतकऱ्यांना यंत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पूर्वसंमती घेऊन साहित्य घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम अदा करण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यात आगामी हंगामात सात लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट असल्याची माहिती दिली. येत्या खरीप हंगामाकरिता जिल्ह्यात पेरणीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांचे १ लाख ५५  हजार १३२ क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कापूस पिकाच्या बीटी कापूस बीजी-२ वाणाच्या एकूण आठ लाख  ११ हजार ५०० पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.

रासायनिक खतांचे मंजूर आवंटन जिल्ह्यासाठी १ लाख ३७ हजार ६६० मेट्रिक टन असून, आतापर्यंत जिल्ह्यात २० हजार ७९२ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com