सोलापूर ः जिल्ह्यात यंदा खरिपाचे क्षेत्र २ लाख ९८ हजार हेक्टर असणार आहे. त्यासाठी कृषी विभागाची पूर्वतयारी सुरू झाली असून, नुकतीच पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत खरीप आढावा बैठकही झाली. या हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणे आणि खतवाटपातील गोंधळ थांबवण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा आहे; पण खरीप हंगामातही बऱ्यापैकी पेरण्या केल्या जातात. त्यात मुख्यतः तूर, उडीद, बाजरी, मका, सूर्यफूल आदी पिकांचा समावेश असतो. खरिपाचे सगळे गणित हे पावसावर अवलंबून असते. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६०० मिमी आहे. जिल्ह्याचा पाऊस तसा उशिराचा ऑगस्ट-सप्टेंबरचा असतो; पण त्याआधी किरकोळ स्वरूपात पडणाऱ्या पावसावरच पेरण्या उरकल्या जातात.
हा पाऊस किती आणि कसा पाऊस पडतो, यावरच यंदाच्या पेरण्यांचे चित्र ठरणार आहे. जिल्ह्याला ३१ हजार ५५६ क्विंटल बियाणे व १ लाख ७३ हजार २९० टन खतांची गरज आहे. गेल्या हंगामात पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध झाली नाहीत. शिवाय कमी पाऊसमानामुळे त्याला मागणीही कमीच राहिली. यंदा मात्र कृषी विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. खते, बियाणांची उपलब्धता व्हावी, यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.
यंदाच्या एकूण २ लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये सर्वाधिक ७० हजार हेक्टरवर तुरीचे क्षेत्र आहे. त्यानंतर उडदाचे ६५ हजार हेक्टर, सोयाबीनचे ४१ हजार हेक्टर आणि मक्याचे ४१ हजार हेक्टर इतके आहे.