औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत गतवर्षी पेरणी झालेल्या क्षेत्राच्या तुलनेत येत्या खरिपात सात टक्के वाढीचा अंदाज आहे. आठही जिल्ह्यांत ५१ लाख २१ हजार हेक्टरवर खरीप पिकांचे पेरणी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप पिकांच्या क्षेत्रात घट, तर हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर जालना व औरंगाबाद जिल्ह्यात खरिपाच्या क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात वाढ प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत खरीप हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ४९ लाख ९६ हजार हेक्टर आहे. गतवर्षी २०१७-१८ मध्ये सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९७.१३ टक्के क्षेत्रावर म्हणजे ४७ लाख ७० हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली होती. या प्रत्यक्ष पेरणीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यात खरिपाच्या क्षेत्रात सात टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
येत्या खरिपात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०३ टक्के म्हणजे ५१ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप क्षेत्रात सर्वांत कमी ४ टक्के, तर हिंगोली जिल्ह्यातील खरीप क्षेत्रात सर्वाधिक २० टक्के वाढ अपेक्षित आहे. परभणी जिल्ह्यात १७, नांदेड जिल्ह्यात १६, लातूर जिल्ह्यात ६, जालना जिल्ह्यात ६ टक्के खरिपाचे वाढीव क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.
पीकनिहाय क्षेत्रानुसार येत्या खरिपात ज्वारी, बाजरी, भात, कपाशी, ऊस व इतर खरीप पिकांच्या क्षेत्रामध्ये सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत घट प्रस्तावित करण्यात आली आहे. ज्वारीच्या क्षेत्रात ३, बाजरीच्या क्षेत्रात २३, भात क्षेत्रात ६८, उसाच्या क्षेत्रात ८७, कपाशीच्या क्षेत्रात ९, तर इतर खरीप पिकांच्या क्षेत्रात ५६ टक्के घट प्रस्तावित करण्यात आली आहे.
पीकनिहाय सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत मराठवाड्यातील मकाच्या क्षेत्रात ३७, तुरीच्या क्षेत्रात १०, मुगाच्या क्षेत्रात ४२, उडदाच्या क्षेत्रात ३४, सोयाबीनच्या क्षेत्रात २६ टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. संपूर्ण खरीप पिकांच्या क्षेत्रात येत्या हंगामात ३ टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.