किसान मंचाचा आंदोलनाचा शंखनाद

औरंगाबाद : किसान मंचच्या बैठकीत ७ डिसेंबरपासून राज्यभर जेलभरोचा आणि १० लाख शेतकरी देणार जिल्हाधिकाऱ्यांना इच्छापत्र देण्याचा निर्धार व्यक्त करताना राज्यभरातून आलेले प्रतिनिधी. (छायाचित्र : मोहंमद इमरान)
औरंगाबाद : किसान मंचच्या बैठकीत ७ डिसेंबरपासून राज्यभर जेलभरोचा आणि १० लाख शेतकरी देणार जिल्हाधिकाऱ्यांना इच्छापत्र देण्याचा निर्धार व्यक्त करताना राज्यभरातून आलेले प्रतिनिधी. (छायाचित्र : मोहंमद इमरान)

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्‍तीसह इतर मागण्यांवर ७ डिसेंबरपासून राज्यभरात जेल भरो आंदोलन छेडले जाणार आहे. त्यासाठी ७ नोव्हेंबरपासून ७ डिसेंबरपर्यंत राज्यभरातून जवळपास दहा लाख शेतकरी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध सविनय कायदेभंगाच्या सनदशीर व शांततेच्या मार्गाने प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांना तुरुंगात जाण्याचे इच्छापत्र सादर करतील, असा निर्णय किसान मंचाच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला.  शेतकरी, शेतमजुरांच्या न्याय्य हक्‍कांसाठी लढा देण्याकरिता स्थापन किसान मंचाच्या राज्यस्तरीय कार्यसमितीची बैठक रविवारी (ता.५) औरंगाबादेत पार पडली. अध्यक्ष मंचचे निमंत्रक शंकर अण्णा धोंडगे होते. त्यांनी आंदोलनाचा निर्णय स्पष्ट केला. बैठकीला शेतमजूर प्रतिनिधी आमदार जयदेव गायकवाड, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभुर्डे, किसान मंच कार्यकारी सदस्यप्रमुख किशोर माथनकर, शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शंकर गोडसे, मानवेंद्र काचोळे, शेतकरी जागर मंच प्रमुख प्रशांत गावंडे, भारत कृषक समाजाचे अविनाश आदिक, स्वाभिमानी संघटनेचे गजानन अमदाबादकर, माजी आमदार वसंत बोंडे, खेमराज कौर, दत्ता पवार, शिवाजी बनकर, प्रा. मारोती जाधव आदीं उपस्थित होते. किसान मंचच्या माध्यमातून ९ ऑगस्ट ते २ ऑक्‍टोबरदरम्यान सेवाग्राम ते नाशिकदरम्यान शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान काढण्यात आले होते. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमालाचे हमीभाव, वीजपुरवठा व पीकविम्याबाबत सरकारकडून चालविलेला पोरखेळ थांबविण्यासाठी सरकारला ५ नोव्हेंबरपर्यंतची वेळ देण्याचा ठराव शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाच्या नाशिक येथील समारोपीय कार्यक्रमात करण्यात आला होता. दिलेल्या वेळेत सरकारकडून निर्णय न झाल्यामुळे आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी किसान मंचच्या राज्यभरातील २५० तालुक्‍यांतील प्रमुख कार्यसमिती सदस्यांची बैठक रविवारी औरंगाबाद येथील कै. भानुदास चव्हाण सभागृहात घेण्यात आली.  बैठकीतील ठरावांची माहिती देताना श्री. धोंडगे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या कर्जमुक्‍तीसह इतर जिव्हाळ्याच्या विविध मागण्यांवर विविध संघटनांची आंदोलने केली. विरोधी पक्षांकडूनही विधिमंडळात आवाज उठविला गेला. न्यायालयीन लढा अशा वेगवेगळ्या स्तरांवरून प्रयत्न होउनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली.  त्यामुळे शासनाच्या धोरणाविरुद्ध सविनय कायदेभंगाच्या सनदशीर मार्गाने माझी तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचे इच्छापत्र राज्यभरातील जवळपास दहा लाख शेतकरी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देतील, असा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपस्थित झालेल्या किसान मंचमधील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ निर्णायक लढा उभारण्याची इच्छा व्यक्‍त केली.  प्रास्ताविक दत्ता पवार यांनी केल. जळगावचे सोपानराव पाटील, गोंदियाचे मनोहर चंद्रीकापुरे, परभणीचे सुरेंद्र रोडगे, यवतमाळचे अशोकराव धारपळकर, मानवेंद्र काचोळे, शिवाजीराव बनकर, किशोर माथनकर आदी उपस्थित होते. अकोल्याचे प्रशांत गावंडे यांनी सूत्रसंचालन केले. 

शेतकऱ्यांचा जात-धर्म दाखविण्याची वेळ आली आहे. सरकारने हे वेळीच ध्यानी घ्यावे, चर्चा नको निर्णय हवा. सात डिसेंबरपासून केले जाणारे जेल भरो आंदोलन राजकारणविरहित सनदशीर व शांततेच्या मार्गाने केले जाईल. - माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, निमंत्रक किसान मंच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com