कोल्हापुरात पीकविमा योजनेला अत्यल्प प्रतिसाद

कोल्हापुरात पीकविमा योजनेला अत्यल्प प्रतिसाद
कोल्हापुरात पीकविमा योजनेला अत्यल्प प्रतिसाद

कोल्हापूर : जिल्ह्यात पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेस अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. २५ जुलै अखेर केवळ ४५ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. जिल्ह्यात खरीप पिकांमध्ये भात व उसाचे प्रमाण अधिक आहे. पुरेशा पावसामुळे भाताचे पीक चांगले येते. नुकसानीसाठी निकषापेक्षा उत्पादन जास्त येत असल्याने अनेक शेतकरी खरीप पीकविमा उतरवत नसल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे.

पूर्वेकडील तालुक्‍यात उसाचे प्रमाण अधिक आहे. पण, उसाचा समावेश या योजनेत नाही. यामुळे एकूणच या योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  प्रसारमाध्यमे, बैठका या माध्यमातून योजनेचा प्रसार करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी त्यांना कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

अपेक्षित रक्कम नाही राज्यात बहुतांशी ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व अन्य तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी व संबंधित अधिकाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. पण, कोल्हापुरात मात्र उलट चित्र आहे. येथे शेतकऱ्यांना या विम्याविषयी फारशी उत्सुकता नसल्याने शेतकरी विमा उतरविण्यास टाळाटाळ करीत आहेत. अनेक कागदोपत्रपांची जुळवाजुळव करूनही अपेक्षित रक्कम मिळत नसल्याने विम्याकडे दुर्लक्षच होत असल्याचे बॅंकांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

तांत्रिक अडचणींपेक्षा प्रतिसादाची चिंता तांत्रिक समस्या असल्या तरी इथे मात्र शेतकरीच येत नाहीच हीच खरी समस्या कृषी विभागाकडे आहे. अगदी नाममात्र संख्येनेच शेतकरी सहभाग नोंदवत असल्याने ही योजना कोल्हापूर जिल्ह्यासाठी केवळ औपचारिकता ठरत असल्याचे चित्र आहे. गेल्या पंधरवड्यात आलेल्या पुराने अनेक पिकांचे नुकसान झाले. परंतु, नुकसान होऊनही शेतकरी पीकविमा उतरवण्यासाठी फारसा उत्सुक नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात सर्व्हर स्लो आहे. परंतु, शेतकऱ्यांचा दबाव नसल्याने कृषी विभागाबरोबर बॅंकांच्या प्रतिनिधीही या विम्याच्या कामकाजात फारसे व्यस्त नसल्याचे चित्र आहे.

विम्याला मुदतवाढ दिली आहे. याबाबतची कल्पना आम्ही शेतकऱ्यांना विविध माध्यमातून दिली आहे. परंतु, जिल्ह्यात पिकांची परिस्थिती चांगली असल्याने शेतकरी विम्याच्या निकषात बसत नाहीत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही या योजनेत सहभाग घेतला नाही. कमी क्षेत्र असणाऱ्या, जास्त नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांनी तरी या योजनेत सहभागी व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. - उमेश पाटील, विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर

माझी भात शेती आहे. विम्याची रक्‍कम भरण्यासाठी खूप धावाधाव करावी लागते. इतक्‍या गोष्टी करूनही विम्याची रक्कम हाती येत नाही. यामुळे कृषी विभागाने सांगूनही आम्ही विमा उतरविला नाही. - राधाकृष्ण पाटील, हळदी, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com