कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम टप्प्यात

कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम टप्प्यात
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम टप्प्यात

मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण पट्ट्याच्या समस्येवर मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने प्रस्तावित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाला गती मिळाली आहे. यासंदर्भातील प्रकल्प अंमलबजावणी आराखडा आणि विविध कार्यप्रणाली पुस्तिकांच्या मसुद्याला जागतिक बँक तसेच प्रकल्प सुकाणू समितीकडून मान्यता मिळाली आहे. सध्यस्थितीत प्रकल्पाची मंजुरी अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून जागतिक बँकेसोबत करार केले जातील असे प्रकल्पाशी संबंधित उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले.

मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळग्रस्त विभागावर राज्य शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची (पूर्वीचे नाव हवामान अनुकूल कृषी प्रकल्प) सुरवात या विभागातील गावांसाठी करण्यात आली आहे. योजनेंतर्गत दुष्काळी मराठवाड्यातील आणि विदर्भातील क्षारयुक्त जमीन असणाऱ्या गावांमध्ये शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी आणि गावातील जमिनीचे मृद संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्य सरकारने या यापूर्वीच प्रकल्प मंजुरीपूर्व कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन कक्षाची मुंबईत स्थापना करण्यास आणि प्रकल्पासाठी ८०५ पदांच्या आकृतीबंधास मंजुरी दिली आहे. याद्वारे प्रकल्पाची जिल्हा, उपविभाग आणि गाव समूह स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रकल्पास लागणाऱ्या आवश्यक पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

शासनाने नुकतीच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीलासुद्धा मंजुरी दिली आहे. त्याअनुषंगाने कृषी खात्याने नुकताच एक सविस्तर आदेश जारी केला आहे. या प्रकल्पाची १५ जिल्ह्यांतील ५,१४२ गावात पुढील ६ वर्षे कालावधीत म्हणजेच २०१८-१९ ते २-२३-२४ या काळात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेसाठी तब्बल चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जागतिक बँक आणि राज्य सरकार संयुक्तपणे हा खर्च करणार आहे. जागतिक बँकेकडून २,८०० कोटी रुपयांचे कर्ज अल्प व्याज दरावर उपलब्ध होणार आहे. तर राज्य सरकार १,२०० कोटी रुपये स्वनिधीतून देणार आहे. त्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. लवकरच केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाच्या उपस्थितीत जागतिक बँकेसोबत कर्ज पुरवठ्याबाबत वाटाघाटी करण्यात येणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांच्यात प्रकल्प करार करण्यात येणार आहेत.

हवामानातील बदलामुळे शेतीवर होणारे संभाव्य दूरगामी परिणाम

  • वाढत्या तापमानामुळे पीक उत्पादकतेवर विशेषत: कोरडवाहू पिकावर विपरीत परिणाम होऊ शकतो
  • अनियमित पावसामुळे कोरडवाहू पिकासाठी पाणी उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम त्याचबरोबर कमी कालावधीमध्ये जास्त पडणाऱ्या पावसामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते
  • वाढत्या तापमानामुळे जमिनीतील कर्बामध्ये घट होऊन उत्पादकतेत घट होते
  • वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलाव्यात घट होते
  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची उद्दिष्ट्ये

  • हवामान बदलास अनुसरुन कृषी पद्धती विकसित करणे
  • अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादकतेत वाढ करणे
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी मूल्य साखळीमध्ये त्याचा सहभाग वाढविणे
  • राज्यातील अवर्षणग्रस्त व खारपाण पट्टा जमिनी असलेल्या जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नांदेड आणि लातूर या १५ जिल्ह्यांत प्रकल्प राबविणार
  • प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • क्रीडा (CRIDA) व टेरी (TERI) यांनी विकसित केलेल्या शास्त्रीय निर्देशांकाचा वापर करून प्रकल्पांतर्गत समूह पद्धतीने गावांची निवड
  • महसूल मंडळ निहाय उभारणी करण्यात येणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राकडून प्राप्त होणाऱ्या माहितीस अनुसरून शेतकऱ्यांना कृषी हवामान सल्ला
  • शिवारातील पाण्याच्या ताळेबंदानुसार पीक नियोजन
  • जागतिक बॅंकेचा वाटा २,८०० कोटी तर राज्य शासनाचा १,२०० कोटी रुपये असा एकूण 4000 कोटी रुपयांचा प्रकल्प
  • प्रकल्पाचे घटक हवामान अनुकूल कृषी पद्धतीस प्रोत्साहन देणे, सहभागीय पद्धतीने गाव समूहाचा (लघू पाणलोट) नियोजन आराखडा विकसित करणे, हवामान अनुकूल आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, जमिनीत कर्ब ग्रहणाचे प्रमाण वाढविणे, क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेती, पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर, मूलस्थानी जलसंधारण, ओघळीवरचे उपचार, पाणी साठवण संरचनांची निर्मिती, जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण, सूक्ष्म सिंचन, काढणीपश्चात व्यवस्थापन व कृषिमूल्य साखळीचे बळकटीकरण करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती, भाडे तत्त्वावर कृषी अवजारे केंद्र सुविधा निर्मिती, शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीमालेचा संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी विक्री आदी बाबत सहाय्य करणे, बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धींगत करणे, सीड हबसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, महाराष्ट्र राज्य कृती आराखडा, स्थानिक परिस्थितीनुसार व पीकनिहाय कृषी हवामान सल्ला, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, पिकांचे हवामान अनुकूल वाण, जमिनीतील ओलाव्याचे जतन करणे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com