धोरणकर्त्यांना शेतमाल उत्पादकांपेक्षा खाणाऱ्यांचा विचार : पवार

पिकविणारा टिकवावाच लागेल : शरद पवार
पिकविणारा टिकवावाच लागेल : शरद पवार

बारामती, जि. पुणे : देशातील धोरणकर्त्यांना शेतमाल उत्पादकांपेक्षा खाणाऱ्यांचा विचार करायचा आहे. मात्र, खाणाऱ्यांचा विचार करायचा असेल, तर पिकविणारा टिकवावा लागेल. पिकवणारा टिकला नाही, तर अमेरिकेचा मिलो गहू पुन्हा खावा लागेल, असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. १९) दिला.

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राचा रौप्य महोत्सव शारदानगर येथील अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात पवार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रेय भरणे, अॅड. राहुल कुल, भीमराव तापकीर, बबनराव शिंदे, बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अॅड. अशोक पवार, रमेश थोरात, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, सदस्य रोहित पवार, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक त्रिलोचन महापात्रा, उपमहासंचालक ए. के. सिंग, मत्स्य व्यवसाय खात्याचे आयुक्त गोविंद बोडके, महात्मा फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, सौ. सुनंदा पवार व संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की ‘‘देशातील कोट्यवधी लोकांची गरज भागवतो, त्या शेतकऱ्याला सन्मानाने जगता आले, तरच देश पुढे जाईल. शेती अर्थव्यवस्थेशी संबंधित माणसांची खरेदीची क्रयशक्ती कमी झाली तर देश कसा पुढे जाईल? आज केवळ ऊसच नव्हे, तर इतर पिकांबाबतही शेतीची अर्थव्यवस्था संकटात येण्याची शक्यता आहे. भारतात धोरणकर्त्यांची विचारधारा मात्र वेगळी आहे. ज्यांच्याकडे धोरण ठरविण्याची जबाबदारी आहे, ते मात्र पिकांचा उत्पादन खर्च वाढविणे म्हणजे महागाई वाढविणे असा अर्थ घेतात. उत्पादन खर्चाचा व महागाईचा संबंध नाही, तरीही तो तसा विचार करतात. आमचा विचार हा उत्पादन करणाऱ्यांच्या हिताचा व त्यांचा विचार खाणाऱ्यांच्या हिताचा आहे, कारण खाणाऱ्यांची संख्या ८० टक्के व पिकविणाऱ्यांची संख्या २० टक्के आहे. त्यामुळे खाणाऱ्यांकडेच लक्ष जास्त द्यावे लागेल असा त्यांचा विचार आहे, मात्र जोपर्यंत शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होत नाही, तोवर शेतीची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही.’’

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘शेतकरी नवरा नको म्हणणाऱ्यांना इथले तंत्रज्ञान त्यांची मानसिकता बदलण्यास नक्कीच भाग पाडेल. सत्तेत असतील किंवा विरोधातील आमदारांनी सामाजिक समतोल व गरिबांना लागणाऱ्या साधनांसाठी महाराष्ट्राने वेगळेच समाजकारण केले. चांगल्याला चांगले म्हणणारी संस्कृती राज्याच्या राजकारणात टिकून राहिली. तोच वारसा पुढे नेला पाहिजे. तंत्रज्ञानात होणारे बदल व शेतकऱ्याच्या कष्टाच्या तयारीला हमीभावाची जोड व धोरणात सातत्य आपण दिले नाही, तर ही शेती टिकणार नाही. कितीही डिजिटल तंत्र आणले तरी खायला काही नसेल, तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. शेती परवडण्यासाठी काय करावे, यासाठी नेमके कोणते नियोजन असले पाहिजे, यावर आपला भर असायला हवा.’’

राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्र किंवा ट्रस्टच्या आजवरच्या प्रवासात अनेकांचे हात झटल्याचे सांगत शिक्षण, शेती, आरोग्य, करिअर या क्षेत्रांत आणखी प्रवास असाच पुढे करायचा उद्देश असल्याचे नमूद केले. या वेळी आयसीएआरचे उपमहासंचालक एन. के. सिंग यांनीही मनोगत व्यक्त केले.

तत्पूर्वी या कार्यक्रमात राष्ट्रीय पातळीवर शेतीत उल्लेखनीय काम केलेल्या नंदकुमार जाधव, भीमराव गावडे, राजेंद्र जठार, किशोर काटे, अरविंद निंबाळकर, सतीश जगदाळे, संग्राम तावरे या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे माळेगाव येथील नियाम, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, कृषी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी संस्थेत २५ ते ३२ वर्षे काम करणाऱ्या डॉ. रतन जाधव, विजय उपाध्ये, बजरंग हाके, दत्तात्रेय जगताप, हरिश्चंद्र जराड यांच्यासह इतरही कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

काहीही कमी पडू दिले जाणार नाही बारामतीच्या केव्हीकेने २५ गावे दत्तक घेऊन त्यांचे सूक्ष्म सर्वेक्षण करावे आणि त्या गावांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयोग करावा. आम्हीदेखील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. जैविक शेती अधिकाधिक व्हावी यासाठी आमचा प्रयत्न सुरू राहील. केव्हीकेसाठी काहीही कमी पडू दिले जाणार नाही, असे आयसीएआरचे महासंचालक त्रिलोचन माहापात्रा यांनी सांगितले.

दृकश्राव्य माध्यमातून उलगडला केव्हीकेचा प्रवास काळानुसार नवतंत्रज्ञानाचा जागर करीत बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने व पुढे कृषी विज्ञान केंद्राने पाणीप्रश्नावर केलेली सुरवात आता प्रगत तंत्रज्ञानापर्यंत व देशोदेशीचे नवतंत्रज्ञान शेतीपर्यंत पोचविणारा हा प्रवास शारदानगरच्या सभागृहात अगदी अलगदरीत्या उलगडला. कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्राचा रौप्यमहोत्सव सोहळा शारदानगरच्या अप्पासाहेब पवार सभागृहात पार पडला. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचा प्रवास उलगडणारी चित्रफीत दाखविण्यात आली. या चित्रफितीद्वारे २५ वर्षांचा हा प्रवास दृकश्राव्य माध्यमातून उलगडला.

पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद कृषिक प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातून प्रयोगशील शेतकऱ्यांनी शारदानगर येथे सकाळपासूनच गर्दी केली. सकाळी उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे लवकर प्रदर्शन पाहण्याच्या हेतूने शेतकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या. कार्यक्रमाच्या औपचारिक उद्‍घाटनानंतर शेतकऱ्यांनी प्रदर्शन पाहिले.

देशात ६०० पेक्षा अधिक केव्हीकेंमध्ये बारामतीचे केव्हीके हे गेली पाच ते दहा वर्षे देशात अग्रेसर आहे. कृषिकच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांत आपण आणखी चांगले काम करू शकतो हा विश्वास मिळतो. या ठिकाणचे सूत्र असे, की जी पिके आपल्याला शक्य आहेत, उत्तमरीत्या शक्य आहे, ती येथे आणून त्यावर आधारित पीक उभे करून ते दाखविण्याची खबरदारी घेतली आहे. - शरद पवार , माजी केंद्रीय कृषिमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com