सांगली ः चालू गळीत हंगामात ऊसतोडणी मजुरांची कमतरता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गाळप हंगाम मध्यावर आला आहे. ऊसतोडणीसाठी शेतकरी कारखान्यावर हेलपाटे मारत आहेत. मात्र मजूर उपलब्ध होत नसल्याने कारखान्याला ऊस पाठवताना शेतकऱ्याची पुरती दमछाक होताना दिसत आहे.
अनेक ठिकाणी फडकरींना "रोकड'' दिल्याशिवाय तोड मिळणे अवघड झाले आहे. आधीच कमी दराचे चटके सोसत असताना तोडीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
जिल्ह्यात तेरा साखर कारखाने सुरू आहेत. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात सुमारे ३० टक्क्यांनी मजूरसंख्या घटली आहे. याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. त्यातच जिल्ह्यात केवळ सहा कारखान्यांकडे ऊसतोडणी यंत्रे आहेत. मात्र, ही मोठ्या क्षेत्रावरच चालतात. असे असताना वेळेत उसाला तोड मिळत नाही.
यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत.
कारखान्यांच्या गट कार्यालयात प्रोग्रॅममध्ये नाव आले आहे का, हे पाहण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी हेलपाटे मारून त्रस्त झाला आहे. प्रोग्रॅममध्ये नाव व क्रमांक येऊनही फडकरी शेतात येण्यास तयार नाहीत. मुळातच प्रत्येक कारखान्याच्या साधारणतः दोन ते पाच टोळ्या तेही पाच तिथे आठ कोयते असलेल्या आहेत. यामुळे ऊस तुटण्यास विलंब होत आहे.
स्लिप बॉयचे फडकरी ऐकत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. या कारणास्तव सुरवातीला तोड मिळण्यासाठी दीड हजार रुपये मोजणारा बळिराजा आता पाच हजारांवर रक्कम मोजत आहे. पैसे घे पण लवकर तोड दे, अशी विनंती करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पैसे देऊन तोडीस सुरवात झाली की दोन दिवसांनी फड अर्ध्यावर सोडून टोळ्या दुसरीकडे तोड चालू करत आहेत. पैशांच्या हव्यासापोटी टोळ्या शेतकऱ्यांना अडकवून ठेवत आहेत. एकच टोळी दोन ते चार कारखान्यांना ऊस पाठवण्याचे प्रकार होत आहेत. चार दिवसांतून एक खेप कारखान्याला जात आहे.