अकोला : राज्य शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून सातत्याने उल्लेख होत असलेल्या समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमीन भूसंपादनात राज्यात वऱ्हाडातील बुलडाणा व वाशीम या जिल्ह्यांनी मोठी झेप घेतली आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांतून हा महामार्ग जात असून, या आठवडाअखेर बुलडाणा जिल्ह्यातील ६११.४३, तर वाशीममधील ५८७. ०९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.
या महामार्गासाठी बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर , औरंगाबाद, नाशिक, जालना, ठाणे, नगर या दहा जिल्ह्यांतील ७४५०.१८ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. सध्या हे संपादन ३९७८.४ हेक्टरपर्यंत झाले आहे. यात प्रामुख्याने बुलडाणा, वाशीम या दोन जिल्ह्यांमधील ११९३ हेक्टरचे संपादन पूर्ण झाले आहे. जवळपास १९९४ शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने खरेदी केल्या आहेत. आतापर्यंत हे काम सुकरपणे पार पडले.
समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक संपादन झाले आहे. मार्च २०१८ मध्ये या महामार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याचे शासनाने सूतोवाच केले आहे. त्यामुळे तत्पूर्वी उर्वरित जमीन संपादन करावी लागेल; मात्र संपादन करावयाची जमीन, खरेदी करताना शासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. शेतकऱ्यांमधील धुऱ्यांचे वाद, कागदपत्रांमधील त्रुटी, वारसा हक्काची प्रकरणे, न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे यामुळे उर्वरित खरेदी प्रकरणे सोपी नाहीत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळाली.