हमीभावाने तूर खरेदीचा आज अखेरचा दिवस

तूर खरेदी
तूर खरेदी

मुंबई/ अकोला/नगर : हमीभावाने तूर खरेदीचा बुधवारी (ता. १८) अखेरचा दिवस आहे. राज्य सरकारने आतापर्यंत २३ लाख ५२ हजार ३८५ क्विंटल तूर खरेदी केली असून, अजूनही सुमारे २१ लाख क्विंटल तूर खरेदी होणे शिल्लक आहे. तसेच अद्यापही उद्दिष्टाच्या सुमारे ५० टक्के तूर खरेदी शिल्लक असल्याने तूर खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. राज्य सरकारने याआधीच तूर खरेदीच्या मुदतवाढीची विनंती केंद्र सरकारला केली असून, आता केंद्र काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   हमीभावावर चालू वर्षी राज्यात ४४ लाख ६० हजार क्विंटल तूर खरेदीचे लक्ष्य आहे. त्यासाठी २५ जिल्ह्यांमधील ४ लाख १४ हजार ८४४ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. यंदा बोनससह ५,४५० रुपये इतका तुरीचा हमीभाव आहे. १ फेब्रुवारीपासून १८९ ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. याअंतर्गत आतापर्यंत १ लाख ८९ हजार ६४४ शेतकऱ्यांकडून २३ लाख ५२ हजार ३८५ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. म्हणजेच उद्दिष्टाच्या सुमारे ५० टक्क्यांच्या आसपास ही तूर खरेदी झालेली आहे. सुमारे २ लाख २५ हजार शेतकऱ्यांची सुमारे २१ लाख क्विंटल तूर खरेदी होणे बाकी आहे. असे असताना तूर खरेदीची मुदत आज (ता. १८) संपत आहे.  मधल्या काळात तूर खरेदीची हेक्टरी मर्यादा आणि इतर जाचक निकष यामुळे तूर खरेदीची प्रक्रिया रखडली होती. शेतकऱ्यांचे चुकारे अनेक दिवस प्रलंबित होते. गेल्या वर्षी राज्यात हमीभावाने ७६ लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली होती. ही तूर राज्यातील वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये पडून असल्याने नव्या तूर खरेदीसाठी गोदाम सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या वर्षी जाणीवपूर्वक तूर खरेदी रखडवण्यात आल्याचा आरोप होत आहे. परिणामी गेल्या अडीच महिन्यांत अपेक्षित शासकीय तूर खरेदी झालेली नाही.  दरम्यान, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तूर खरेदीची मुदत आणखी वाढविण्याची विनंती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्याकडे केली आहे. ९ एप्रिल रोजी याबाबत खोत यांनी केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे. हमीभावाने तुरीच्या खरेदीसाठी राज्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली असून, निर्धारित मुदतीमध्ये तूर खरेदीसाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नोंदणी झालेल्या सर्व तूर खरेदीस ३१ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्यमंत्री श्री. खोत यांनी केली आहे. मात्र, शासकीय खरेदीची मुदत संपत आली असताना, मंगळवार दुपारपर्यंत तरी (ता. १७) केंद्र शासनाने मुदतवाढीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यात तूर खरेदी रखडल्याच्या काळात आर्थिक गरजेपोटी शेतकऱ्यांना नाइलाजाने प्रतिक्विंटल एक हजार रुपयांहून अधिकचा तोटा सहन करत व्यापाऱ्यांना तूर विकावी लागल्याचे चित्र होते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे सुमारे ५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शासकीय तूर खरेदीला मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

यंत्रणा मंगळवारीही बंदच तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन करणाऱ्या चांदुर मार्ग (मुंबई) येथील ‘सर्व्हर’ यंत्रणा मंगळवार (ता. १७) दुपारपर्यंत बंदच होती. ऑनलाइन यंत्रणा बंद असल्याने तूर, हरभरा खरेदीवर आज परिणाम झाला आहे. राज्यातील काही खरेदी केंद्रावर खरेदी बंद करावी लागली आहे. ‘आज यंत्रणा सुरू होईल’ असे संबंधितांकडून सांगितले जात आहे. नाफेडतर्फे सुरू करण्यात आलेल्या तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन करणाऱ्या चांदुर मार्ग (मुंबई) येथील ‘सर्व्हर’ यंत्रणा सोमवारी (ता. १६) जळाल्याने राज्यात तूर, हरभरा खरेदीची ऑनलाइन यंत्रणा कोलमडली. सोमवारी रात्रीपर्यंत ऑनलाइन यंत्रणा सुरू होईल, असे संबंधिताकडून सांगण्यात आले होते. मात्र मंगळवारी दुपारपर्यंत यंत्रणा बंदच होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com