नगर ः शेतीला पूरक म्हणून नव्हे; तर आता दुग्ध व्यवसाय मुख्य उद्योग झाला आहे. मात्र अजूनही अनेक शेतकरी शास्त्रोक्त पद्धतीने दूध व्यवसाय करताना दिसत नाहीत. दूध व्यवसायात प्रगती साधायची असेल, तर मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा. चाऱ्याची बचत करण्यासाठी मुरघास तयार करावा, असे प्रतिपादन चितळे डेअरीचे विस्तार अधिकारी चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केले.
नगर येथे सुरू असलेल्या ‘सकाळ- अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनातील चर्चासत्रात रविवारी (ता. २५) चंद्रशेखर कुलकर्णी यांनी ‘मुक्तसंचार गोठा आणि मुरघासनिर्मिती व दुधाळ जनावरे प्रजाती’ या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कुलकर्णी म्हणाले, की शेतीला दुग्ध व्यवसायाचा मोठा आधार आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे दुभती जनावरे आहेत. मात्र दुग्ध व्यवसाय आता पारंपरिक पद्धतीऐवजी नव्या शास्त्रोक्त पद्धतीने करण्याची गरज आहे. एका जागी गोठ्यात जनावरे बांधून ठेवली, तर डासांचा प्रादुर्भाव होतो. जनावराची मानसिकता फारशी चांगली राहत नाही. शारीरिक व्यायाम होत नाही. त्या सगळ्या बाबीचा जनावरांच्या आरोग्यावर आणि परिणामी दूध उत्पादनावर परिणाम होतो.
त्यामुळे दूध व्यवसाय फायदेशीर आणि चांगला करायचा असेल तर मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब गरजेचा आहे. त्यामुळे चाराही कमी प्रमाणात लागतो. चितळे डेअरीने राज्यातील दहा हजार जनावरांसाठी टॅगिंग केले असून, त्यामुळे प्रमुख बाबी त्या पशुपालकांना योग्य पद्धतीने हाताळता येत आहेत.
कुलकर्णी म्हणाले, की मुरघास हा दुभत्या जनावरांसाठी महत्त्वाचा आहे. एकाच वेळी मुरघास ४५ दिवस हवाबंद करून ठेवल्यावर जनावरे आवडीने खातात. त्यामुळे चारा आजिबात वाया जात नाही. मुरघासातून तीन टक्के शुष्क घटक मिळतो. दररोज जनावरांना साधारण दहा किलो मुरघास दिल्यास दूध उत्पादनात वाढ होतेच, पण जनावरांचे आरोग्य सुधारते. मका, ज्वारी, बाजरी, ओटस, गवतवर्गीय पिके, हरभरा, सोयाबीन, ल्युसर्न, बर्सिम, टाकाऊ पालेभाज्या याचा मुरघास करता येतो. या वेळी कुलकर्णी यांनी राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या मुक्तसंचार गोठा, मुरघास करण्याची प्रात्यक्षिके दाखवली.