नगर ः देशासह राज्यातील अनेक भागांत ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. मात्र, आजही अनेक ठिकाणी उसाची शेती खर्चिक आहे. खर्चाच्या सहा पट उत्पादन निघाले तर ऊसशेती किफायतशीर आहे. ऊस शेती फायद्याची करायची असेल तर पाणी, खतासह पीक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, असे मत वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्युटचे माजी संचालक, ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव हापसे यांनी व्यक्त केले.
नगर येथील ‘सकाळ-अॅग्रोवन’ कृषी प्रदशर्नात शनिवारी (ता. २४) उसाचे एकरी दीडशे टन किफायतशीर उत्पादन तंत्र या विषयावर डॉ. हापसे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की देशात महाराष्ट्रात उसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात होते. नगर जिल्हाही ऊस उत्पादनात आघाडीवर होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. व्यवस्थापनातील अडचणी उस उत्पादन वाढीला अडथळा ठरत आहेत.
उसाचे उत्पादन वाढीसाठी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. लागवड करताना पाच ते सात फुटाची सरी काढून दोन उसातील अंतर दोन फुटाचे राहील अशी लागवड करावी. लागवडीआधी व्यवस्थापन योग्य राहील यासाठी जमिनीची सुपीकता तपासावी. जैविक, रासायिनक व त्यासोबत सेंद्रिय कर्ब पाहणे महत्त्वाचे आहे.
ऊस उत्पादन घेताना ठिबकचा वापर महत्त्वाचा आहे. खताची मात्रा देताना लागवड पद्धतीचा विचार करूनच द्यावी. उसाची शेत चांगले तणमुक्त राहण्यासाठी आंतरपीक महत्त्वाचे आहे. शक्य तेवढा सेंद्रिय खताचा वापर केला तर जमिनीचा पोत सुधारण्याला मदत होते. पाचटाचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा. साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याचीही गरज आहे. उसाची शेती करताना व्यवयाय आणि व्यापारी दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.