वाढीव गाळपक्षमतेचे परवाने अडकले नियमांच्या कात्रीत

ऊस गाळप
ऊस गाळप

कोल्हापूर : एकमेकांच्या स्पर्धेतून कारखान्यांनी गाळपक्षमता वाढविण्याचा सपाट लावला आहे. काही कारखान्यांनी वाढविलेल्या गाळपक्षमतेचा परवाना मागण्यासाठी आयुक्तालयाला अर्ज केला असला, तरी अनेक नियमांच्या कात्रीत हे परवाने अडकले आहेत. गाळपाची क्षमता वाढविलेल्या कारखान्यांना वाढीव गाळपक्षमतेचा परवाना मिळविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.   कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात यंदा अनेक कारखान्यांनी विस्तारीकरणाचा सपाटा लावला आहे. यात गाळपक्षमता वाढविण्यातही स्पर्धा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तर बहुतांशी मोठ्या कारखान्यांनी एक हजारापासून ते चार हजार मेट्रिक टनांपर्यंत गाळपक्षमता वाढविण्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात मात्र त्यांना आयुक्तालयाकडून परवानीच मिळाली नाही. यामुळे यंदाही गेल्या वर्षीच्या क्षमतेवरच बहुतांशी साखर कारखाने चालणार, असे साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. शासनाकडे यंत्रणा नाही वाढीव गाळपक्षमतेला परवाने देताना त्या कारखान्याची आर्थिक स्थिती, फायदा-तोटा, कारखान्याचे ऊस क्षेत्र, सध्याच्या उसाची परिस्थिती इत्यादी बाबी लक्षात घेऊन मगच परवाना दिला जातो. आश्‍चर्याची बाब म्हणजे शासनाकडे कारखान्याकडे उपलब्ध उसाची तपासणी करण्याची यंत्रणाच नाही. कृषी विभागही याची तपासणी करण्यास असमर्थ आहे. अनेक कारखान्यांनी तेच तेच कार्यक्षेत्र दाखविल्याने कार्यक्षेत्रही रिपिट झाले आहे. कार्यक्षेत्र किती आहे हे सध्या तरी तपासता येणे शक्‍य नसल्याने आता वाढीव क्षमतेने गाळप करण्यासाठी कारखान्यांना परवान्याची प्रतीक्षाच करावे लागण्याची शक्‍यता आहे.   जुन्या क्षमतेवरच चालणार कारखाने यंदा गाळप हंगामास सुरवात झाली आहे. प्रत्येक कारखान्याने गळीत हंगाम सुरू करताना गाळपक्षमता वाढविल्याचा अभिमानाने उल्लेख केला. पण यंदा या वाढीव क्षमतेने हे गाळप होणार नसल्याचे चित्र आहे. अनेक कारखान्यांनी अद्यापही याबाबतचा परवाना काढलेला नाही. तर ज्यांनी परवाना मागितला आहे त्यांच्यापुढे अटींचा डोंगर आहे.  एक कारखाना वाढल्याची परिस्थिती जिल्ह्यात कारखान्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळप आपल्या कारखान्यात व्हावे या उद्देशाने थोड्या थोड्या प्रमाणात  गाळपक्षमता वाढविली. या कारखान्यांच्या वाढीव गाळपक्षमतेचा अंदाज घेतल्यास जिल्ह्यात एकूण गाळपाच्या सुमारे दहा हजार मेट्रिक टनांची वाढीव क्षमता तयार झाली आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात एक नवा मोठा कारखाना तयार झाल्यासारखी स्थिती आहे. यंदा उसाची वाढ शेवटच्या टप्प्यात वाढल्याने काहीसा दिलासा कारखान्यांना मिळाला आहे. तरीही एकूण उत्पादनाचा विचार केल्यास उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. आताच कमी क्षमतेने कारखाने सुरू राहण्याची शक्‍यता आहेत. यातच वाढीव क्षमता वापरल्यास त्याला ऊस कोणता आणायचा हाही प्रश्‍न भविष्यात कारखान्यांना सतावणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com