सोलापूर : मागील काही दिवसांपासून महावितरणने राज्यभर वीज भारनियमन चालू केले होते. ऐन सणासुदीच्या काळात वीज भारनियमन केल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती. या भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. भारनियमनामुळे शेतीसाठी मात्र रात्री अवेळी वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
गेल्या एक-दोन दिवसांपासून भारनियमन बंद झाल्याचा दावा महावितरणचे अधिकारी करत आहेत. पण शेतीसाठी दिला जाणारा वीजपुरवठा पूर्वीसारखा करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. संपूर्ण राज्यभर शेतीसाठी रात्री अवेळी वीजपुरवठा केला जात आहे. पूर्वी रात्री दहा तास तर दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात होता. भारनियमन सुरू झाल्यामुळे दोन्ही वेळी शेतीचा वीजपुरवठा आठ तासांचा केला आहे. या बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
या बदलामुळे शेतीसाठी रात्री केला जाणारा वीजपुरवठा अतिशय त्रासदायक ठरत आहे. रात्री ११ ते सकाळी सात या वेळेत वीजपुरवठा सुरू ठेवला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलले असता वीजपुरवठ्यामध्ये झालेला तुटवडा हळूहळू भरून येऊ लागला आहे. गावातील भारनियमन बंद केले आहे. शेतीसाठीच्या वीजपुरवठ्याच्या वेळेतही पूर्वीप्रमाणे बदल केला जाईल, असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. मात्र, अद्याप काहीच झालेले नाही.