शेतकरी कर्जमाफीचा ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या थकबाकीदारांना मिळणार लाभ

३१ जुलै २०१७ पर्यंतच्या थकबाकीदारांना मिळणार कर्जमाफीचा लाभ
३१ जुलै २०१७ पर्यंतच्या थकबाकीदारांना मिळणार कर्जमाफीचा लाभ

पुणे : राज्य सरकारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेंतर्गत ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या थकबाकीदारांनाही कर्जमाफी योजनेत समाविष्ट करून घेतले जाणार आहे. याशिवाय दीड लाख व त्यापेक्षा अधिक कर्जाची एकरकमी परतफेड आणि थकीत, उर्वरित हप्त्यांची रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत भरणाऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारकडून गुरुवारी जाहीर करण्यात आला. शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनानंतर सरकारने जून महिन्यामध्ये कर्जमाफी योजना जाहीर केली. पीक कर्ज व अन्य शेती कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंका आणि व्यापारी बॅंकांकडून घेतलेले दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तसेच कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून २५ हजार रुपये देण्याचाही निर्णय घेतला होता. थकबाकीदार शेतकऱ्यांचे अल्प, अत्यल्प भू-धारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता कर्जमाफीचे लाभ देण्यात येणार असल्याचे घोषित केले होते; परंतु विहित मुदतीनंतर व्याजाची जबाबदारी ज्या-त्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकांवर सोपविल्यामुळे अतिरिक्त व्याजाचा बोजा बॅंकांवर येणार होता. परिणामी, बॅंकांच्या सर्व खातेदारांच्या लाभांशातून ही रक्कम भरावी लागली असती. कर्जमाफीच्या पहिल्या आदेशामध्ये ३० जून २०१६ रोजी थकीत असलेले मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात यावे, असे म्हटले होते. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘एकवेळ समझोता योजना’ (वन टाइम सेटलमेंट) जाहीर केली. यात कर्जदाराने दीड लाखाच्या वरील रक्कम एकरकमी भरावी, अशी अट घातली होती. यात ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली होती. त्यानंतर या आदेशात काही बदल केले. २०१५-१६ या आर्थिक वर्षात घेतलेल्या पीक व मध्यम मुदत कर्जाची परतफेडीची तारीख ३० जून २०१६ नंतर येत होती. तसेच २०१६-१७ या आर्थिक वर्षात घेतलेल्या पीक व मध्यम मुदत कर्जाची परतफेडीची तारीख ३१ जुलै २०१७ नंतर आली. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी गुरुवारी नवीन शासननिर्णय जाहीर करण्यात आला. महिना अखेरपर्यंत भरा थकीत रक्‍कम एक एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीतील वाटप केलेल्या पीक कर्जापैकी ३० जून २०१६ पूर्वी किंवा नंतर पुनर्गठित-फेरपुनर्गठित झालेल्या कर्जांचे ३१ जुलैपर्यंतचे कर्ज थकीत असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला आहे. थकीत कर्जाची रक्कम दीड लाखांपेक्षा अधिक असेल तर थकीत पीक कर्जासह पुनर्गठनाची-फेरपुनर्गठनाची रक्कम ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत भरल्यास त्यांना दीड लाखापर्यंतची कर्जमाफी दिली जाईल. त्याबाबतचा निर्णय गुरुवारी जाहीर करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com