सातारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार १७५ थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यांवर दहा कोटी ५१ लाख २१५ रुपयांची रक्कम जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेत जमा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकाच्या कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
दुष्काळी परिस्थितीसह विविध कारणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाल्याने राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात यासाठी विरोधी पक्षांनी गत अधिवेशात सरसकट कर्जमाफीसाठी गोंधळ घातला होता. त्यानंतर संघर्ष यात्राही काढली.
या दरम्यान राज्यभर शेतकरी आंदोलन उभे राहून शेतकऱ्यांनी आक्रमकपणे महाराष्ट्र बंद केला. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला.
त्यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत, तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
तसा अध्यादेश सहकार विभागाने २८ जूनला काढला. कर्जमाफीच्या अध्यादेशातील निकषानुसार, १ एप्रिल २०१२ नंतर ज्यांनी कर्ज घेतलेले आहे आणि ३० जून २०१६ रोजी जे थकबाकीदार आहेत, अशा शेतकऱ्यांची ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सांगण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यात दोन लाख ४० हजार ७४७ अर्ज दाखल दाखल झाले होते.
यापैकी जिल्ह्यातील दोन हजार २०३ शेतकऱ्यांचा समावेश झाला. मात्र, त्यातील २८ अर्जदार शेतकऱ्यांनी दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरली नसल्याने ते अपात्र ठरले.
या शेतकऱ्यांनी डिसेंबरअखेर दीड लाखावरील कर्जाची परतफेड केल्यास हे शेतकरी कर्जामाफीस पात्र ठरणार आहेत. त्यातील पात्र २१७५ थकबाकीदार शेतकऱ्यांना दहा कोटी ५१ लाख २१५ रुपयांची रक्कम जिल्हा बॅंकेत जमा करण्यात आली आहे. ही पहिली यादी असून यानंतर टप्पाटप्प्याने पुढील याद्या प्रसिद्ध होणार आहेत.