व्यक्ती घटक सूत्रांनुसार ‘ओटीएस’ची दीड लाखावरील रक्कम परत मिळणार

व्यक्ती घटक सूत्रांनुसार ‘ओटीएस’ची दीड लाखावरील रक्कम परत मिळणार
व्यक्ती घटक सूत्रांनुसार ‘ओटीएस’ची दीड लाखावरील रक्कम परत मिळणार

मुंबई : शेतकरी कर्जमाफी योजनेत कुटुंबाऐवजी नव्याने व्यक्ती हा घटक गृहीत धरला जात असल्याने पूर्वीच्या निकषानुसार शेतकऱ्याने एकरकमी परतफेड योजनेच्या (ओटीएस) लाभासाठी भरलेली दीड लाखाच्या वरील रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना परत केली जाणार आहे. उदाहरणार्थ, एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांच्या थकबाकीपोटी शेतकऱ्याने उर्वरित एक लाख रुपये भरले असतील, तर अशा प्रकरणांत व्यक्ती घटक या सूत्रानुसार इतर निकषांच्या अधीन राहून पात्र शेतकऱ्यांना भरलेली अशी रक्कम परत मिळणार आहे. सहकार खात्याने यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांमधील कर्जमाफीच्या लाभाबाबतचा असंतोष, संदिग्धता आणि विरोधकांचे आरोप यामुळे सरकारने नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात योजनेअंतर्गत प्रतिकुटुंब दीड लाखाच्या मर्यादेत कर्जमाफीची अट शिथिल करून कुटुंबातील प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरीत्या दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. याआधी कुटुंब घटक ग्राह्य धरल्यामुळे कुटुंबाला एकत्रित दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफीच मिळत होती.

योजनेच्या आधीच्या निकषानुसार कुटुंबाच्या सर्व कर्जदार सदस्यांच्या पात्र कर्जखात्याची एकूण थकबाकी दीड लाखापेक्षा जास्त आहे, अशा अर्जदार कुटुंबातील पात्र सदस्यांनी दीड लाखावरील रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर त्यांना शासनाच्या वतीने प्रतिकुटुंब दीड लाख रुपयांच्या मर्यादेत लाभ देण्यात येत होता. मात्र, सुधारित शासन निर्णयानुसार कर्जमाफीच्या इतर निकषांना अधिन राहून यापूर्वीच्या प्रतिकुटुंब दीड लाखापर्यंत कर्जमाफीच्या लाभाऐवजी यापुढे अर्जदार कुटुंबातील प्रत्येक पात्र कर्जदार सदस्याला दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.

१ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत उचल केलेल्या पीक, मध्यम मुदत आणि पुनर्गठीत कर्जाच्या ३१ जुलै २०१७ पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेल्या थकबाकी रकमेपोटी कुटुंबातील पात्र वैयक्तिक कर्जदार सदस्याला दीड लाखाच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा असे आदेशात म्हटले आहे. ही रक्कम दीड लाखापेक्षा जास्त असल्यास योजनेच्या प्रचलित (कुटुंब घटक) निकषानुसार दीड लाखावरील रक्कम कुटुंबातील पात्र कर्जदार सदस्याने बँकेकडे भरल्यास त्यास शासनाच्या वतीने एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत दीड लाख रुपये लाभ देण्यात यावा. प्रस्तावित (व्यक्ती घटक) निकषाप्रमाणे अंमलबजावणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रचलित (कुटुंब घटक) निकषानुसार दीड लाखाच्यावर भरलेली रक्कम परत करण्यात येणार आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शेतकरी कर्जमाफी योजनेत कुटुंबाऐवजी व्यक्ती हा घटक गृहीत धरण्यात येत असल्याने शेतकरी कुटुंबातील पात्र सदस्यांच्या वैयक्तिक कर्जखात्यांच्या थकबाकीची पुनर्गणना करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक सदस्याला दीड लाख रुपये कर्जमाफी, एकरकमी परतफेड योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पुनर्गणनेनंतर लाभ निश्चित करून कुटुंबातील वैयक्तिक कर्जदार सदस्याची पात्र थकबाकीची रक्कम दीड लाखापेक्षा कमी असल्यास अशा परिस्थितीत योजनेच्या यापूर्वीच्या निकषानुसार कुटुंबाच्या एकूण थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड योजनेच्या लाभासाठी भरलेली दीड लाखावरील रक्कम शासनाकडून शेतकऱ्याच्या बँक खात्यात परत करण्यात येणार आहे.

तसेच बदललेल्या निकषानुसार कर्जदार वैयक्तिक शेतकऱ्याची थकबाकीची रक्कम दीड लाखाच्या आत असल्यास आणि लागू असेल तेथे अशा शेतकऱ्यांकडील पुर्नगठीत कर्जाच्या उर्वरित हप्त्यांच्या देय असलेल्या रकमेसह दीड लाख या मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. दरम्यान, या सुधारित निर्णयाचा दाखला देत शेतकरी कर्जमाफीच्या अपेक्षेने बँकांचे उंबरठे झिझवत आहेत. मात्र, काही ठिकाणी शासन आदेश मिळाला नसल्याचे सांगत बँका हात वर करत असल्याचे दिसून येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com