मुंबई : अनेक घोषणांनंतर लांबलेली कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार अाहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंगळवारी (ता. १९) झाली. त्यानंतर कृषिमंत्री फुंडकर यांनी याबाबत माहिती दिली.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत आहे. या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. बँकांनीसुद्धा वेळेत कर्जमाफीसाठीची सर्व माहिती, माहिती तंत्रज्ञान विभागाला उपलब्ध करून द्यावी, अशी चर्चा उपसमितीच्या बैठकीत करण्यात आली.
मंगळवारी दुपारी १२ पर्यंत ५६ लाख ७ हजार ८८३ शेतकरी कुटुंबांचे अर्ज कर्जमाफीसाठी प्राप्त झाले आहेत. सर्व बँकांनी कर्जमाफीसाठी लागणारी सर्व माहिती, माहिती तंत्रज्ञान विभागाला वेळेत उपलब्ध करून द्यावी. तसेच बँकांकडून संपूर्ण माहिती उपलब्ध झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाने तपासणी करावी. ज्या जिल्ह्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल; त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री फुंडकर यांनी दिली.
या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहनमंत्री दिवाकर रावते, जलसंपदामंत्री गिरीश महाजन अादी उपस्थित होते.
कर्जमाफीची माहिती
संकलित करण्यासाठी विलंब
जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बॅंका कर्जमाफीची एकत्रित माहिती संकलित करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे माहितीसाठी विलंब लागत आहे. जिल्हानिहाय तातडीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अर्जदारांची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.