नगर ः राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख ४७ हजार ४६२ शेतकऱ्यांना ८७१ कोटी ४४ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. या योजनेत यापूर्वीच्या कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी १ मेपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.
नगर जिल्हा बॅंकेतर्फे पात्र दोन लाख १० हजार ३९५ लाभार्थ्यांना ६१४ कोटी २३ लाख रुपये व व्यापारी, ग्रामीण व खासगी बॅंकांतर्फे पात्र ३७ हजार ६१ लाभार्थ्यांना २५७ कोटी २१ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.
राज्य शासनाने ही योजना जाहीर केल्यानंतर सुरवातीच्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये २४ जुलै ते २२ सप्टेंबर २०१७ अखेर तीन लाख ३४ हजार ९२० शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज ‘आपले सरकार पोर्टल’वर अपलोड करण्यात आले. त्यापैकी आधार कार्ड संलग्नित ऑनलाइन अर्ज अपलोड केलेल्या शेतकऱ्यांची संख्या तीन लाख १५ हजार १०० इतकी होती. जिल्हा बॅंकेला त्यापैकी ६१४ कोटी २३ लाख रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. या रकमेचे वितरण दोन लाख १० हजार ३९५ लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. व्यापारी बॅंकेस प्रत्यक्ष प्राप्त झालेल्या ४१४ कोटी ५३ लाख रकमेपैकी ३७ हजार ६१ लाभार्थ्यांना २५७ कोटी २१ लाख रुपयांचे वितरित करण्यात आले आहे.
उर्वरित रक्कम संबंधितांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्याचे निर्देश संबंधित बॅंकांना देण्यात आले आहेत. या कर्जमाफी योजनेत राज्य शासनाने जाहीर केलेल्या दीड लाख रुपयांच्या आतील थकबाकी तसेच पुनर्गठण, प्रोत्साहनपर आणि एकरकमी परतफेड योजनेत सहभागी लाभार्थ्यांना त्यांच्या बॅंक खात्यावर थेट लाभ देण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले.