जळगाव : जिल्ह्यात कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना ८११ कोटी ८२ लाख रुपये निधी देण्यात येणार असून, यापैकी ५६९ कोटी १६ लाख रुपये पात्र लाभार्थींच्या खात्यांवर वर्ग केल्याचा दावा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केला आहे. परंतु नियमित कर्जदार २५ टक्के सवलतीपासून वंचित असून, त्यांना आपल्या सवलतीसंबंधी बॅंक, सहायक निबंधक कार्यालयात सारख्या चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात दोन लाख सात हजार कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची ग्रीन यादी जाहीर झाली आहे. परंतु या यादीमधील काही शेतकऱ्यांची माहिती मिसमॅच असल्याचे आढळले आहे. त्यामुळे घोळ वाढला आहे. संबंधित मिसमॅच माहिती दुरुस्त करण्यासह खात्री करण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांना सहायक निबंधक कार्यालयाकडून बोलाविण्यात आल्याचा दावाही प्रशासन करीत आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीसह २५ टक्के सवलतीचा लाभही मिळालेला नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
नियमित कर्जदारांनी कर्ज भरून चूक केली का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
पाच हजार लोकसंख्येच्या गावात फक्त आठ ते १० नियमित कर्जदारांनाच लाभ मिळाला आहे. निम्म्यापेक्षा अधिक कर्जदार वंचित आहेत. त्यामुळे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा केल्याचा दावा केला जात असला, तरी किती शेतकऱ्यांना पैसे मिळाले, याची पडताळणी करायला हवी, अशी मागणीही शेतकरी करीत आहेत.
जिल्ह्यात कर्जमाफीस पात्र १९ हजार ७१६ शेतकऱ्यांच्या दोन ग्रीन याद्या जाहीर झाल्या असून, या शेतकऱ्यांसाठी ७२ कोटी ६८ लाख २५ हजार ९३० रुपये निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेअंतर्गत दोन लाख २७ हजार ५२८ कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचा दावा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केला आहे.