सोलापूर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ८३ हजार ८८८ शेतकऱ्यांना आतापर्यंत ४५१ कोटी ५६ लाख रुपये मिळाले आहेत. कर्जमाफी योजनेतून जिल्हा बॅंकेच्या ५२ हजार २८० शेतकऱ्यांना २६५ कोटी रुपये, तर राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकेच्या ३१ हजार ६०८ शेतकऱ्यांना १८६ कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिली.
जिल्हा बॅंकेला मिळालेल्या ग्रीन लिस्टमधील ९५ हजार १७९ शेतकऱ्यांपैकी २७ हजार ८२८ शेतकऱ्यांची माहिती दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने २४ हजार ९३३ शेतकऱ्यांची माहिती दुरुस्त करून पुन्हा अपलोड करण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेचे यलो लिस्टमधील १० हजार १४० शेतकऱ्यांपैकी तीन हजार २२४ शेतकरी कर्जमाफी योजनेस पात्र ठरले आहेत.
जिल्ह्यातील डाटा मिसमॅच असलेल्या शेतकऱ्यांची माहिती तालुकास्तरीय समितीकडून दुरुस्त करून पुन्हा अपलोड करण्याचेही काम पूर्ण झाले असल्याचे जिल्हा उपनिबंधक देशमुख यांनी सांगितले.