सातारा : कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील २८ हजार ९८७ शेतकऱ्यांची सहावी हिरवी यादी (ग्रीन लिस्ट) जिल्हा बॅंकेकडे आली आहे. या यादीची तपासणी होणार असून, त्यातून किती शेतकरी लाभार्थी ठरणार हे स्पष्ट होणार आहे. कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. आतापर्यंत कर्जमाफी योजनेतून ३०५ कोटी रुपयांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे.
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. आतापर्यंत पाच ग्रीन याद्या शासनाकडून बॅंकांकडे आल्या व त्यातील पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३०५ कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. यापूर्वी पाचव्या ग्रीन यादीतील जिल्हा बॅंकेकडील ४०३७ शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठविली होती. त्यापैकी १२०७ शेतकरी लाभासाठी पात्र ठरले. उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफी अर्जात त्रुटी राहिल्याने त्याची तपासणी करण्यात येत आहे.
आता शासनाने सहावी ग्रीन यादीही बॅंकेकडे पाठविली आहे. या यादीत २८ हजार ९८७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या यादीची तपासणी होणार आहे. यानंतरच त्यापैकी किती शेतकरी लाभार्थी होणार हे निश्चित होणार आहे. त्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी योजनेचे पैसे जमा होणार आहेत.
त्यामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या सहाव्या यादीत आपले नाव येण्याची अपेक्षा आहे. सध्यातरी ही यादी जिल्हा बॅंकेकडे तपासणीसाठी आली आहे. त्यामुळे कर्जमाफीचे लाभार्थी होण्याची अपेक्षा आणखी वाढली आहे.