औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता.१८) आयोजित कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्राचे सन्मानपूर्वक वाटप पालकमंत्री रामदास कदम व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी दुपारी १२ ते २ या वेळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सकाळी नियोजीत वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रातिनिधीक स्वरूपात निमंत्रित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसह तीन आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्षांनी हजेरी लावली. पालकमंत्र्यांच्या हस्ते व विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली या कर्जमाफी प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार होते. जवळपास अडीच वाजताच्या सुमारास पालकमंत्री रामदास कदम यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर कर्जमाफी प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यातील कर्जमाफी योजनेंतर्गत कार्याचा आढावा सादर केला. जवळपास १५०० केंद्रावरून कर्जमाफीसंदर्भातील प्रक्रिया राबविण्यात आली. ऑडिट आणि चावडी वाचनाचे काम जिल्ह्यात पूर्ण करण्यात आले असून कर्जमाफीत बसणाऱ्या ६० टक्के शेतकऱ्यांची यादी शासनाच्या वेबसाइटवर टाकण्यात आली आहे. येत्या पंधरवड्यात उर्वरीत शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या प्रत्यक्ष कक्षेत आणन्याचे काम केले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शासनाच्या कर्जमाफीसंदर्भात माहिती देतांना खरा शेतकरी वंचित राहता कामा नये, यासाठी शासनाने पुरेपूर खबरदारी घेतली. औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास साडेपाच लाख अर्ज आले असले तरी दोन ते सव्वादोन लाख शेतकरी शासनाच्या योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. त्यामुळे त्यांना लवकरच कर्जमुक्त केले जाईल. ज्यांच्यावर दीड लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, अशांनी ओटीअस करीत आपल्याकडील उर्वरित कर्जाचा भरणा करून शासनाच्या दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ घेण्याचे आवाहनही श्री. बागडे यांनी केले.
या वेळी आमदार प्रशांत बंब, आमदार अब्दुल सत्तार, आमदार अतुल सावे, आमदार संदीपान भूमरे, जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय सहनिबंधक आर. पी. सुरवसे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड उपस्थित होते.
२०१७ पर्यंत कर्जमाफीची शिवसेनेची मागणी कायम आहे. दिवाळीपूर्वी काही अंशी का होईना दिलासा देण्याचे काम झाले आहे, त्यामुळे पालकमंत्री म्हणून रामदास कदम यांनी धन्यवाद मानल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.