बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत कर्जमाफी दिली आहे. मागील शासनाच्या काळात कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर नऊ महिन्यांनी रक्कम बॅंक खात्यात जमा झाली होती. मात्र, या शासनाने घोषणेनंतर केवळ साडेतीन महिन्यांत कर्जमाफीची रक्कम बॅंक खात्यात जमा केली आहे. ही कर्जमाफी या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांना दिलेली एक मोठी व अविस्मरणीय भेट असून शेतकऱ्यांना पुढे जाण्याची ताकद देणारी आहे, असे मत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केले.
कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या २१ शेतकरी कुटुंबांचा बुधवारी (ता.१८) येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. या वेळी श्री. फुंडकर बोलत होते. या वेळी चिखली तालुक्यातील पळसखेड दौलत येथील पुंजाजी बदर यांच्या कुटुंबाचा पहिला सन्मान करण्यात आला. यानंतर शालिग्राम किसन कुटे, स्वप्नील ओमप्रकाश गुप्ता यांच्या कुटुंबांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला खासदार प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती, आ. शशिकंत खेडेकर, उमाताई तायडे, जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे, अशोक खरात यांच्यासह इतर उपस्थित होते.
कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर ऑडिट करून शासनास अंतिम यादी सादर करण्यात जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या याद्यांच्या १९५ फाईल शासनाकडे सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन व बॅंकर्सचे मंत्री फुंडकर यांनी अभिनंदन केले.
यावेळी खासदार जाधव, उमाताई तायडे, आमदार संचेती यांनी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी व त्यानंतर होत असलेल्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाचे कौतुक केले. प्रशासनाने ज्या तातडीने ही प्रक्रिया राबवली ती कौतुकास्पद असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी यंत्रणेबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक खरात यांनी केले.