कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गतवेळी दिलेल्या कर्जमाफीत राहिलेल्या त्रुटी लक्षात घेत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी दक्षता घेतली आहे. सरसकट दीड लाखापर्यंतचे कृषी कर्ज माफ करून शेतकऱ्यांना सन्मानित करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण व सत्कार सोहळा बुधवारी (ता.१८) जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या योजनेत कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ७० हजार ५९० अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅंकांमधील ५३,२६२ थकबाकीदार असून, २२३ कोटी १७ लाख रुपये थकबाकीची रक्कम आहे. राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण बॅंकांमधील ५४,७२९ थकबाकीदार असून, ६५ कोटी १३ लाख रुपये थकबाकीची रक्कम आहे. जिल्ह्यातील एकूण पात्र १८४७ विकास कार्यकारी सहकारी संस्थामधील २ लाख ५२ हजार ९७० सभासदांची माहिती अपलोड करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
प्रत्येक तालुक्यातील २ अशा २४ लाभार्थी शेतकरी दांपत्यांचा प्रमाणपत्र, साडी-चोळी व पेहराव देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा उप निबंधक (सहकारी संस्था) अरुण काकडे, विभागीय सह निबंधक (सहकारी संस्था) तुषार काकडे, पणनचे विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब यादव, जिल्हा विशेष लेखा परीक्षक डी. बी. बोराडे-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.