सांगली : सातत्याने शेतकरी कर्जमाफीच्या यादीत गोंधळ सुरू आहे. जिल्हा बॅंकेत आलेल्या कर्जमाफीच्या चौथ्या यादीला राज्य शासनाने स्थगिती दिली. त्यातील तांत्रिक त्रुटींच्या दुरुस्तीला विलंब होत आहे. चौथ्या यादीतील २८ हजार शेतकरी आणि त्यांच्यासाठीच्या ५१ कोटी रुपये अनुदानाबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. कर्जमाफीचा होणारा विलंब शेतकऱ्यांना सातत्याने धक्का देणारा ठरत आहे.
कर्जमाफीच्या कर्जदारांच्या यादीची फेरपडताळणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चौथी यादी सर्व विकास सोसायट्यांना पाठवण्यात आली होती. त्यांची फेरछाननी करून याद्या पुन्हा शासनाला ऑनलाइन पाठवण्यात आल्या आहेत.
चौथ्या यादीत कर्जमाफी मिळालेले ३ हजार ७४ शेतकरी आहेत. त्यांना १०.७८ कोटींची कर्जमाफी मिळणार आहे. प्रोत्साहन अनुदानाचे २५ हजार ४२३ शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी ३९.२० कोटींची तरतूद करण्यात आली. वन टाईम सेटलमेंटसाठी (ओटीएस) पहिल्या यादीत एक हजार ५१९ शेतकरी होते. ती संख्या कमी होऊन अवघे ७९९ शेतकरी पात्र ठरले आहेत.
शासनाकडे पाठवलेली चौथी यादी अद्यापही दुरुस्त झाली नाही. त्यामुळे ही यादी कधी दुरुस्त होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यातच चौथ्या यादीत तांत्रिक दुरुस्त्यांसाठी आयटी विभागाने कंबर कसली आहे. दोन दिवसांत फेर यादी जाहीर होईल, असे तीन दिवसांपूर्वी सांगितले होते. प्रत्यक्षात सहा दिवसांनंतरही यादी प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे आयटी विभागाचा गलथानपणा सातत्याने समोर येत आहे. परिणामी आयटी विभागावर शासनाचे नियंत्रण नाही का, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.