नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून दिवाळी गोड केली आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
बुधवारी (ता. १८) जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. या वेळी आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी जिल्ह्यातील २५ शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमाफी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रास्ताविक विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांनी केले व आभार जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. संतोष देवराये यांनी केले.