शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा प्रयत्न ः डॉ. भामरे

नाशिक येथे कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप
नाशिक येथे कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत कर्जमुक्तीचा लाभ मिळत असल्याने त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे बुधवारी (ता.१८) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ अंतर्गत कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर, अनिल कदम, प्रभारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, सहकार सहनिबंधक मिलिंद भालेराव आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. भामरे म्हणाले, की गारपीट, दुष्काळ आणि अवेळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. कर्जाच्या चक्रातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी सरकारने कर्जमाफी जाहीर केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये नवा विश्वास निर्माण झाला असून, ते नव्या उमेदीने शेती करतील आणि कृषिक्षेत्राच्या विकासालाही चालना मिळेल.

शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ज्यांनी अनेक वर्षे सत्ता उपभोगली त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात केवळ १६ टक्के सिंचन होते. शेतीचे नियोजन चुकल्याचे लक्षात आल्यामुळे हे सिंचन वाढविण्यासाठी भाजप सरकारने शाश्वत कार्यक्रम हाती घेतला असून, त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. जलयुक्त शिवार योजनेमुळे २० लाख हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आले असून, १५ हजार गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याचा दावा डॉ. भामरे यांनी केला.

केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून राज्यातील २६ प्रकल्पांसाठी प्राधान्याने आर्थिक साह्य मंजूर केले आहे. त्यामुळे अपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. काश्‍मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या एअर कमांडो मिलिंद खैरनार यांच्या पत्नीने लष्करात नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केल्यास नियमाप्रमाणे नोकरी दिली जाईल, असे आश्वासन संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी दिले. संरक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे मिलिंद खैरनार यांचे पूर्ण वेतन त्यांच्या पत्नीला दिले जाणार आहे. सोबतच त्यांनी नोकरीची इच्छा व्यक्त केली तर स्वाती महाडिक यांच्या प्रमाणेच नियमांची तपासणी करून त्यांनाही नोकरी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातून एक लाख ७४ हजार ५२५ शेतकरी कुटुंबांचे अर्ज ऑनलाइन प्राप्त झाल्याची माहिती गावडे यांनी दिली. राज्यस्तरीय कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com