सातारा : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत म्हणून शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला असून, ही कर्जमाफी देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी आहे. या कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणार असून, त्यांचा सातबारा उतारा कोरा होईल, असा विश्वास पालकमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’अंतर्गत शेतकरी कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण बुधवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री श्री. शिवतारे यांच्या हस्ते जिल्ह्यातील २२ शेतकऱ्यांना करण्यात आले.
या वेळी ते बोलत होते. सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा उपनिबंधक महेश कदम, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे राजेंद्र सरकाळे आदी या वेळी उपस्थित होते.
पालकमंत्री शिवतारे म्हणाले, की राज्यभरातून ५६ लाख ५९ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले हाते. ऑनलाइन अर्ज भरल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यालाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांमधून शेतकऱ्यांचे जीवमान उंचविण्यास मदत होत आहे. शासनाने कर्जमाफी देण्यासाठी ३ वर्षे अभ्यास केला व योग्य वेळी कर्जमाफी दिली, त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करतो.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार ६० हजार, नियमित परतफेड करणारे १ लाख ७५ हजार, तर पुनर्गठित कर्जदार शेतकारी १५ हजार असे एकूण २ लाख ५० हजार शेतकऱ्यांना अंदाजे ४९० कोटींचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी व त्यांना शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानातून दुष्काळी भागातही टॅंकरची संख्या कमी झालेली असल्याचे त्यांनी सांगितले.